Mandangad : शिरगाव येथे कारचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

मंडणगड : तालुक्यातील शिरगाव परिसरात आज, मंगळवार १८ नोव्हेंबर रोजी पहाटे साधारण चारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे. MH 08 AX 9589 या क्रमांकाची वेंगनार गाडी अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल चरामध्ये जाऊन कोसळली. धुके आणि अंधारामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण ढासळले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

अपघात इतका भीषण होता की गाडीतील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये हर्षदा जोशी (वय 70, रत्नागिरी) आणि शंकर करमरकर (वय 50, मुळगाव राजापूर, सध्या दापोली) यांचा समावेश आहे. तर प्रमोद मुकुंद लिमये (वय 35, केळशी) यांसह एक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पहाटेच्या शांत वातावरणात झालेल्या या अपघाताची माहिती स्थानिक ग्रामस्थांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्याच्या कडेला खोल चरामध्ये अडकलेल्या गाडीची अवस्था पाहून नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले. काही मिनिटांतच मंडणगड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांच्या मदतीने गाडीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठी मशक्कत केली. त्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून रस्त्याची स्थिती, वाहनाचा वेग आणि तांत्रिक बाबींचा पंचनामा करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेत रत्नागिरी आणि राजापूरमधील दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने दोन्ही ठिकाणी हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:35 PM 18/Nov/2025