गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या : जिल्हाधिकारी मनुज जिंदल

रत्नागिरी : गणपतीपुळे येथील समुद्रात पर्यटक बुडण्याच्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या. प्रशिक्षित मनुष्यबळ, गृहरक्षक दल, पोलिस, धोका दर्शक झेंडे, नो-स्विमिंग झोन, ब्रेथ अॅनालायझरद्वारे मद्यपींवर दंडात्मक कारवाई यासारख्या उपाययोजना कराव्यात. त्यासाठी सर्व यंत्रणांनी योगदान दिले पाहिजे, असे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सांगितले.

गणपतीपुळे येथील समुद्रात पर्यटक बुडण्याच्या दुर्घटनेवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सूर्यवंशी, अधिकारी अजय उप-मुख्यकार्यकारी अधिकारी सागर पाटील, गटविकास अधिकारी चेतन शेळके, ग्रामसेवक प्रवीण चौधरी, सरपंच कल्पना पकये, गणपतीपुळे देवस्थानचे अध्यक्ष नीलेश कोलटकर, पंच श्रीराम केळकर, खजिनदार अमित मेहंदळे, मोरया वॉटरस्पोर्टसचे अध्यक्ष उदय पाटील, ग्रामसदस्य राज देवरुखकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले, ‘गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. त्यासाठी एखादी तांत्रिक एजन्सी नेमून अभ्यास करावा व त्यामार्फत कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. सद्यःस्थितीमध्ये एलईडी स्क्रीन लावून पर्यटकांनी किनाऱ्यावर काय करावे, काय करू नये याबाबतच्या सूचना द्याव्यात. तपासणी मनोरे (वॉच टॉवर) ची संख्या आणि प्रशिक्षित मनुष्यबळ वाढवावे. लाऊड स्पीकरवरून वारंवार सूचना तसेच माहितीची उद्घोषणा करावी. गृहरक्षक दल आणि पोलिसांची मदत घेऊन ब्रेथ अॅनालाइझरद्वारे मद्यपींवर दंडात्मक कारवाई करावी. अपघात थांबविण्यासाठी, मृत्यूचे प्रमाण शून्य करण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपले योगदान द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.

चाळ किंवा खड्डे बनताहेत धोकादायक
गणपतीपुळे येथील समुद्र दरवर्षी पावसाळी हंगामात मोठ्याप्रमाणात खवळतो. त्यामुळे समुद्रात चाळ किंवा खड्डे निर्माण होतात. तसेच पावसाळा संपल्यानंतर हिवाळा सुरू झाला की समुद्राची स्थिती पुन्हा जैसे थे होते, परंतु यंदा दिवाळीनंतर गणपतीपुळेतील किनारा धोकादायक बनलेला आहे. भरतीवेळी किनाऱ्यापर्यंत आलेले पाणी काही खड्ड्यांमध्ये साचून राहत आहे. तसेच पुन्हा भरतीवेळी असे तयार झालेले खड्डे पोहणाऱ्या पर्यटकांसाठी धोक्याचे ठरू शकतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 20/Nov/2025