राजापुरात १० लाख ३६ हजारांची करवसुली

राजापूर : येथील नगरपालिकेला सार्वत्रिक निवडणूक चांगलीच फायदेशीर ठरली आहे.

निवडणूक कालावधीमध्ये पालिकेची तब्बल १० लाख ३६ हजार ८३१ रुपयांची करवसुली झाली आहे.

कोणत्याही शहरामध्ये, विशिष्ट भागाला मूलभूत सुविधा देणे आणि अन्य विकासात्मक कामे करण्यासाठी निधीची आवश्यकता असते. निधीची उपलब्धतता करून देणारे त्या त्या भागाकडे विविध स्रोत असतात. त्यापैकी शहराचा कारभार पाहणार्‍या पालिकांचेही स्रोत आहेत. त्यामध्ये शासनाकडून विविध फंडांतून मिळणारा निधी आणि विविध स्वरूपांच्या करातून मिळणारे उत्पन्न या प्रामुख्याने दोन स्रोतांचा त्यामध्ये समावेश होतो. ‘क’ वर्गातील असलेल्या येथील नगरपालिकेला शहरातील रस्ते, पाणी वा अन्य स्वरूपाच्या लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून फारसा निधी मिळत नाही. नागरिकांकडून गोळा होणारा हा कर १ एप्रिल ते ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये गोळा करावा लागतो. त्यासाठी विशेष मोहीम राबवावी लागते. ही निवडणूक करवसुलीसाठी फायदेशीर ठरली आहे. निवडणुकीसाठी अर्ज केलेले उमेदवार आणि त्यांना असलेले सूचक यांनी आपली कराची रक्कम पालिकेकडे भरणा केली आहे. त्यातून पालिकेला १० लाख ३६ हजार ८३१ रुपयांची वसुली झाली आहे.

कररूपाने मिळालेले उत्पन्न
पाणीपट्टीः २ लाख ७५ हजार ०५०
घरपट्टीः ७ लाख ६१ हजार ७८१
एकूणः १० लाख ३६ हजार ८३१

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:05 22-11-2025