Ratnagiri : जिल्ह्यात ८ हजार ४६० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट

रत्नागिरी : पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने सध्या मिशन बंधारा हा उपक्रम हाती घेतला आहे. विशेष म्हणजे शून्य पैशात जिल्ह्यात लोकसहभागातून ८ हजार ४६० बंधारे बांधण्यात येणार आहेत. यामधून कोट्यवधी लिटर पाणी साठा होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी राज्याच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस पडतो. परंतु, भौगोलिक परिस्थितीमुळे दरवर्षीच शेकडो गावांमध्ये पाणीटंचाई जाणवते. जिल्ह्यातील भौगोलिक स्थितीमुळे पावसाचे पडणारे पाणी हे समुद्राला जावून मिळते. यामुळे पडणाऱ्या पावसाचा तसा पाणी टंचाईचा फायदा होत नाही. नदी, नाले यावर धारे बांधले तर पाणी अडवले जाईल. या धर्तीवर जिल्हा परिषदेने गेल्या काही वर्षापासून बंधारे बांधण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी बंधारे बांधले जातात. शेवटी याचा परिणाम पाणी टंचाईच्या गावांवर झाला आहे. पाणी टंचाईची तीव्रता कमी आली आहे. पूर्वी जिल्ह्यात ३०० ते ४०० गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. मात्र, सध्या हा आकडा १५० ते २०० वर आला आहे.

यावर्षीसुद्धा जिल्हा परिषद मिशन बंधारे बांधण्याच्या कामाला लागली आहे. आत्तापर्यंत ६० बंधारे बांधण्यात आले आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीला १० बंधारे बांधण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती असून ८ हजार ४६० बंधारे बांधण्याचे आहे. उद्दिष्ट डोळ्यासमोर विशेष म्हणजे जिल्हा परिषदेने शुन्य पैशात हे बंधारे बांधण्याची मोहिम हाती घेतली आहे. यासाठी लोकसहभाग घेतला आहे. प्रत्येक गावात श्रमदान केले जाणार आहे. तसेच बंधारा उभारण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक संस्था यांचा सहभाग घेण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:52 PM 02/Dec/2025