महाराष्ट्राला अनेक गोष्टी मिळाल्या आहे, विरोधकांनी नरेटिव्ह सेट करण्यासाठी राजकारण करू नये : देवेंद्र फडणवीस
मुंबई : विनाकारण नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतो, ते तुमच्या समोर आहे. माझा विरोधकांना सल्ला आहे की, फक्त नरेटिव्ह सेट करण्यासाठी राजकारण करू नका.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये विद्यार्थी वर्ग, तरुण, शेतकरी, महिला, स्टार्टअप यांसाठी अनेकविध योजना घोषित केल्या. तसेच काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. कररचनेत बदल करण्यात आला आहे. बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी विशेष तसेच मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पावरून आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर टीका करण्यात येत असून, एनडीएतील पक्षांकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात येत आहे. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेचा देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.
इन्कम टॅक्समध्ये मध्यमवर्गीय कुटुबांना फायदा होणार
इन्कम टॅक्समध्ये मध्यमवर्गीय कुटुबांना फायदा होणार आहे. केवळ घोषणा न करता भविष्याचा वेध घेत ही घोषणा करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांसाठी ११ लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. मुद्रा लोन १० लाख वरून आता २० लाख पर्यंत वाढवण्यात आले आहे. सामाजिक कल्याणच्या विकासाचा दर महागाई दरापेक्षा जास्त आहे. आरोग्य क्षेत्रातला खर्च दुप्पट झालं आहे. या दोन्ही महत्त्वाच्या क्षेत्रातील गुंतवणूक दुप्पट केली आहे. मोठी गुंतवणूक करणारा हा अर्थसंकल्प आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांसाठी नवीन योजना जाहीर करण्यात आली
शेतकऱ्यांसाठी नवीन योजना जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या धर्तीवर केंद्र सरकारने अप्रेंटिशिप स्कीमची योजना घोषणा केली. रोजगाराची निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ग्रामविकास क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, मध्यमवर्गाला फायदा देत भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प आहे. देशाचा अर्थसंकल्प संतुलित असून देशातील युवा, गरीब आणि शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलेला संतुलित अर्थसंकल्प आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:33 23-07-2024
What's Your Reaction?