पंतप्रधानांनी माफी मागितली असली तरी सशर्त मागितली, मध्येच सावरकरांना आणले : पृथ्वीराज चव्हाण
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पालघर येथील सिडको मैदानावर 76 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर 26 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याबद्दल मोदी यांनी शिवरायांची माफी मागितली.
नुसती माफी मागून चालणार नाही
दरम्यान, मोदींच्या माफीनाम्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी (Prithviraj Chavan on PM Modi) तोफ डागली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, पंतप्रधानांनी माफी मागितली असली तरी सशर्त माफी मागितली आहे. त्यांनी मध्येच सावरकरांना आणले. पंतप्रधान आणि भाजपला महाराजांच्या पुतळ्याचा इव्हेंट करायचा आहे. नुसती माफी मागून चालणार नाही. महाराष्ट्रातील जनतेमध्ये संताप आहे. माफी मागून काही फायदा होणार नाही, जबाबदारी निश्चित केली पाहिजे. दरम्यान, पंतप्रधानांच्या कार्यक्रमापूर्वी विरोधी पक्षनेत्यांनी मुंबईत पुतळा पाडल्याचा निषेध केला. पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना नजरकैदेत ठेवले आहे. गेल्या वर्षी 23 डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.
शिवरायांची शंभरवेळा माफी मागायला तयार
यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुतळा पडल्याप्रकरणी माफी मागितली होती. सडकून टीकेला सामोरे जावे लागत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सांगितले की, गरज पडल्यास शंभरवेळा शिवरायांची माफी मागायची तयारी आहे. विरोधकांकडे राजकारण करण्यासाठी इतरही मुद्दे आहेत, पण महाराष्ट्रात आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांना त्यापासून दूर ठेवले पाहिजे. दुसरीकडे, शिवरायाच्या पुतळा कोसळण्याच्या घटनेमुळे निर्माण झालेल्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुर्घटनेची कारणे शोधण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:13 30-08-2024
What's Your Reaction?