येत्या चार दिवसांत रत्नागिरीत १० हजार कोटींच्या डिफेन्स प्रकल्पाचा 'एमओयू' : उद्योगमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये येत्या चार दिवसांमध्ये १० हजार कोटींच्या संरक्षण क्षेत्राशी निगडित प्रकल्पाचा 'एमओयू' करण्याचा निर्णय उद्योग विभागाने घेतला असून, केवळ सामंजस्य करार न करता रत्नागिरी तालुक्यातील एक हजार एकर क्षेत्र शेतकऱ्यांच्या संमतीने प्रकल्पाला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
शुक्रवारी येथील एमआयडीसी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. याबाबत मंत्री सामंत म्हणाले की, येत्या दोन किंवा तीन दिवसांमध्ये अथवा पुढील आठवड्यात या प्रकल्पाची घोषणा होईल. त्याचा 'एमओयू' देखील होईल आणि १ हजार एकर जागा संबंधित कंपनीच्या ताब्यात देऊ. तसेच आपण केवळ 'एमओयू' करत नसून १० हजार कोटींच्या या प्रकल्पाला जागा देत असल्याचे उद्योगमंत्र्यांनी सांगितले.
रत्नागिरीतील मेडिकल कॉलेजसाठी नव्याने इमारत बांधायची आहे. त्याच्या संबंधित जागेचा प्रश्न मार्गी लागला असून, त्यासाठी चंपक मैदान येथील साडेपाचशे एकर जागा आपल्याकडे आली असून, त्यातील २० एकर जागा ही वैद्यकीय शिक्षण विभागाला देण्याचा निर्णय एमआयडीसी प्रशासनाने घेतला असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले. २०० कोटी रुपयांचे ट्रेनिंग सेंटर टाटा बरोबरच होत आहे. त्याचा देखील शुभारंभ नुकताच पार पडला. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात एकंदरित उद्योग आणणे आणि उद्योगासाठी शैक्षणिक पात्रता असलेले गुणवंत विद्यार्थी तयार करणे हे मिशन घेऊन आम्ही कामाला लागलो होतो. त्याला यश आल्याचे उद्योगमंत्र्यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी हे एज्युकेशन हब झाले असून आपल्याकडे मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, टाटा स्कील डेव्हलमेंट सेंटर तसेच या आधीही एक स्कील सेंटर झाले आहे. संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र, बी. फॉर्म, डी. फॉर्म, मरिन इंनिनिअरिंग, पॉलिटेक्निक, आयटीआयसह खासगी कॉलेजसही असल्यामुळे रत्नागिरी एज्युकेशन झाल्याचे उद्योगमंत्री म्हणाले. मुंबई, पुण्यानंतरचा रत्नागिरी एज्युकेशन हब बनले असून तब्बल दीड हजार विद्यार्थी रत्नागिरीत शिकत असल्याचे ना. सामंत यांनी नमूद केले.
प्रकल्पामुळे रत्नागिरीचे नाव जागतिक पातळीवर झळकणार
रत्नागिरीत होणारा हा प्रकल्प संरक्षण क्षेत्रासंबंधित असून, या प्रकल्पामुळे रत्नागिरीचे नाव जगाचा पातळीवर जाणार असल्याचा विश्वास उद्योगमंत्री तथा रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 31/Aug/2024
What's Your Reaction?