रत्नागिरी: कोकणचा राजा मानल्या जाणाऱ्या हापूस आंब्याचा हंगाम सध्या रत्नागिरीत पूर्ण जोमात आहे. मात्र, एकीकडे झाडे आंब्यांनी लगडलेली असताना दुसरीकडे मजुरांच्या प्रचंड टंचाईमुळे आंबा बागायतदार हवालदिल झाले आहेत. या संकटावर मात करण्यासाठी रत्नागिरीतील एका कल्पक बागायतदाराने चक्क ‘क्रेन’ची मदत घेत आंबा काढणी केली आहे. त्यांच्या या अनोख्या प्रयोगाची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे.
नेपाळी मजुरांच्या टंचाईचा फटका
रत्नागिरी आणि परिसरातील आंबा बागांमध्ये आंबे काढण्यासाठी दरवर्षी नेपाळमधून मोठ्या संख्येने मजूर येत असतात. झाडावर चढून शिताफीने आंबा काढण्यात हे मजूर पटाईत असतात. मात्र, यंदा नेपाळहून येणाऱ्या मजुरांची संख्या अत्यंत कमी असल्याने बागायतदारांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. वेळेवर आंबा न काढल्यास तो झाडावरच खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे.
क्रेनच्या सहाय्याने आंबा काढणी: वैभव वायंगणकर यांचा प्रयोग
रत्नागिरीतील कर्ला गावातील आंबा उत्पादक वैभव सुरेश वायंगणकर (आंबेशेत वायंगणकरवाडी) यांची मोठी बाग आहे. मजुरांच्या टंचाईमुळे आंबा काढणी रखडल्याने त्यांनी एका आगळ्यावेगळ्या पर्यायाचा विचार केला. त्यांनी झाडावर चढण्यासाठी मजुराची वाट न पाहता चक्क क्रेन पाचारण केली. क्रेनच्या मदतीने उंचावरील फांद्यांपर्यंत पोहोचून सुरक्षितपणे आंबे काढण्याचे काम त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले.
टीमवर्क आणि तांत्रिक साथ
या धाडसी आणि कल्पक कामात वैभव वायंगणकर यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची साथ दिली. यामध्ये आर्यन वायंगणकर, प्रफुल्ल वायंगणकर, विवेक बाचरे, हेमंत वायंगणकर, आयुष घोसाळे, तनिष ठाकूर आणि भूमी वायंगणकर यांचा समावेश होता. तसेच क्रेन ऑपरेटर अन्सार भाई यांनी अतिशय कौशल्याने क्रेन हाताळत ही काढणी सुलभ केली.
बागायतदारांसमोर नवा आदर्श
मजुरांच्या कमतरतेमुळे हतबल न होता, आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून आंबा काढणी कशी करता येते, याचे उत्तम उदाहरण वायंगणकर यांनी समोर ठेवले आहे. वाढती मजुरी आणि मजुरांची अनुपलब्धता यामुळे भविष्यात शेती आणि बागायतीमध्ये यंत्रांचा वापर वाढवणे किती गरजेचे आहे, हे या घटनेतून अधोरेखित होत आहे.














