HSC Exam Result 2026: बारावीच्या विद्यार्थ्यांना २५ मे रोजी गुणपत्रक आणि प्रमाणपत्रांचे वाटप

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात इयत्ता १२ वी परीक्षेचे गुणपत्रक, प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रांचे वाटप सोमवार, दि.२५ मे रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली.

राज्यातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर २ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आला होता.

निकालानंतर आता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गुणपत्रक आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधित विभागीय मंडळांकडून सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सोमवार, दि. २५ मे रोजी सकाळी ११ वाजता गुणपत्रक, प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र, तसेच तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख सुपूर्द करण्यात येणार आहेत. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी ३ वाजल्यापासून संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना ही कागदपत्रे वितरित केली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वीकारताना आवश्यक ओळखपत्रासह संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 23-05-2026