रत्नागिरी : Ratnagiri School Holiday संदर्भात रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ऑरेंज अलर्टमुळे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सोमवार, ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील महाविद्यालयांनाही सुट्टी लागू करावी, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून, हवामान विभागानेही पुढील परिस्थिती लक्षात घेऊन ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून शाळांसोबतच महाविद्यालयांनाही सुट्टी लागू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था आणि अंगणवाड्या सोमवार, ६ जुलै रोजी बंद राहणार आहेत.
मुसळधार पाऊस आणि संभाव्य प्रतिकूल हवामानामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, तसेच आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.














