मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान झालेल्या भूस्खलनामुळे हायस्कूलच्या इमारतीला गंभीर धोका; ३५० विद्यार्थ्यांचे तातडीने स्थलांतर
देवरुख:
Kolambe High School Sealed | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामादरम्यान झालेल्या मोठ्या भूस्खलनामुळे धोकादायक ठरलेल्या कोळंबे येथील कमळाजाबाई हायस्कूलची नवीन इमारत अखेर गुरुवारी पोलीस बंदोबस्तात सील करण्यात आली आहे. महामार्गाच्या कामामुळे शाळेच्या मागील बाजूस मोठे भूस्खलन होऊन इमारत विद्यार्थ्यांच्या वापरासाठी अत्यंत असुरक्षित बनली होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत पंचायत समिती सभापती शर्वरी वेल्ये यांच्या पुढाकाराने व समयसूचकतेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
भूस्खलनामुळे शौचालय आणि ६ वर्गखोल्या धोक्यात
बुधवारी झालेल्या भूस्खलनामुळे हायस्कूलची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती. यामध्ये शाळेचे शौचालय पूर्णपणे धोकादायक बनले असून, शाळेच्या ६ वर्गखोल्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला होता. डोंगराची आणखी दरड कोसळल्यास शाळेच्या संपूर्ण इमारतीलाच मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. महामार्गाच्या कामात संबंधित ठेकेदाराने आवश्यक त्या संरक्षणात्मक उपाययोजना न केल्यामुळेच ही धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याचा थेट आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
सभापती शर्वरी वेल्ये यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक आणि निर्णय
शाळेची इमारत धोक्यात आल्याची माहिती मिळताच पंचायत समिती सभापती शर्वरी वेल्ये यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, शासकीय अधिकारी आणि शाळा व्यवस्थापनाची संयुक्त बैठक बोलावली. गुरुवारी झालेल्या या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून नवीन इमारत तात्काळ सील करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला व पाहणी दरम्यान पंचायत समिती सदस्य सुहास मांगडे, विजय परीट, गट शिक्षण अधिकारी, नायब तहसीलदार गिरी, अमर चाळके, नयन मुळ्ये, संस्थाध्यक्ष आणि संचालक मंडळ, जे. एम. म्हात्रे इंजिनिअर, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, आतिष पाटणे आणि गटविकास अधिकारी आनंद लोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
३५० विद्यार्थ्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर; पालकांचे समाधान
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या सुमारे ३५० विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही इमारत तातडीने बंद करण्यात आली आहे. धोकादायक ठरलेल्या सहा वर्गखोल्यांमधील विद्यार्थ्यांचे तातडीने दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने आधी नाराजी व्यक्त केली जात होती, परंतु आता प्रशासनाने थेट इमारत सील करून विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी उचललेल्या या पावलामुळे पालकांनी मोठे समाधान व्यक्त केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 10-07-2026














