गुहागर : दरवर्षी कोकणात उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या प्रकर्षाने जाणवते. पाणीटंचाईच्या या संकटावर मात करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून दरवर्षी पावसाळा संपल्यावर मिशन बंधारे मोहीम हाती घेतली जाते. मात्र सद्यस्थितीत काही ठिकाणी बंधारे ओस पडल्याचे चित्र आहे.
कोकणात मार्च महिन्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचे संकट उभे राहते. यावर मात करण्यासाठी अनेक गावांमध्ये शासनाकडून मिशन बंधारे मोहीम राबविण्यात आली. यासाठी शासनाकडून सुरुवातीला बंधारा बांधण्यासाठी साहित्य तसेच मजुरीही दिली गेली. त्यामुळे या मोहिमेला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, मात्र कालांतराने हे बंधारे मोहीम मंदावल्याचे दिसून येत आहे. कारण यासाठी शासनाकडून बंधारे साहित्य, मजुरी मिळणे बंद झाल्याने या मोहिमेला अनेक ठिकाणी तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. ग्रामपंचायतस्तरावर आजही बंधारे बांधण्याचे आवाहन केले जाते, मात्र मोबदला आणि साहित्य उपलब्ध केले जात नसल्याने सध्या बंधारा बांधण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत.
यावर्षी पाऊस उशिरापर्यंत पडल्याने पाणीसाठे उशिरापर्यंत आटणार नाहीत, असे सर्वांनाच वाटत होते. मात्र, पावसाने पाठ फिरवल्यानंतर अनेक ठिकाणी पाणीसाठे आटल्याचे चित्र आहे. साहजिकच यामुळे बंधारेही कोरडे पडले आहेत. अनेक ठिकाणी श्रमदानातून बंधारे बांधण्यात आले आहेत, मात्र अनेक ठिकाणी हे बंधारे नदी-नाल्याना पाणीसाठा नसल्याने बंधाऱ्यांमध्येही पाणीसाठा झालेला नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 27/Dec/2024












