कडवई : संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथील हरेकरवाडी महसूल गावातील नळपाणी योजनेच्या लाभार्थ्यांची पाणी पाणीपट्टी भरलेली असतानाही कोणतीही पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा बंद करण्यात आला. याप्रकरणी सरपंच सहदेव सुवरे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी, या मागणीसाठी तुरळ येथील ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी अकरा वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.
मौजे तुरळ निर्मल तंटामुक्त गु्रप ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील हरेकरवाडी या महसूल गावात ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेप्रमाणेच अन्य चार स्वतंत्र खासगी योजना गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. यातील चोबारवाडी येथील योजनेवरील ग्रामस्थांनी पाणीपट्टी भरलेली असतानाही सरपंच सहदेव सुवरे यांनी पाणी पुरवठा बंद केला. जिल्हापरिषद प्राथमिक शाळेचाही पाणीपुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी याना पत्र दिले होते. त्यानंतर तत्काळ मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या आदेशाने हा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, पदाचा गैरवापर करत राजकीय सूडबुद्धीने सरपंच सहदेव सुवरे यांनी केलेल्या या मनमानी विरोधात येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 प्रमाणे सरपंच सहदेव सुवरे यांचेवर पदाचा गैरवापर केल्याने अपात्रतेचि कारवाई व्हावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र दिले होते. त्यानुसार कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थानी ठिय्या आंदोलन छेडले. यावेळी नंदकुमार फडकले, विजय बामणे, संदीप येलोंडे, मंजिरी फडकले, शमिका बामणे यांच्यासह ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते.
सरपंच सहदेव सुवरे यांच्याशी संपर्क साधला असता ही योजना चालवणे ग्रामपंचायतीला परवडणारे नसून 68 कुटुंबापैकी 23 कुटुंबानी पाणीपट्टी भरली आहे. इतर थकीत असल्याने आपण हे पाणी बंद केले. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानंतर आपण तत्काळ पाणी सुरू केल्याचे सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 17-01-2025
