दापोली आगाराला ८० बसेसची मागणी, मिळाल्या फक्त सहाच!

दापोली : दापोली आगाराला नव्या बसेसची प्रतीक्षा असताना एसटी महामंडळाने कुर्ला-नेहरूनगर येथून पाच आणि परळ आगारातून एक अशा एकूण सहा बसेस दापोली आगाराला हस्तांतरित केल्या आहेत. प्रत्यक्षात दापोली आगाराला ८० बसेसची मागणी असताना महामंडळाने सहाच बसेस देऊन दुधाची तहान ताकावर भागवल्यासारखे केले आहे.

महामंडळाच्या या कारभाराविरोधात दापोली-मंडणगड प्रवासी मित्र संघटनेच्यावतीने २६ जानेवारीपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. दापोली आगारातून मुंबई, ठाणे, नालासोपारा, बोरिवली, कोल्हापूर, बेळगाव, नाशिक, शिर्डी आदी मार्गावर लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्यात येतात तर रत्नागिरी, चिपळूण, खेड, मंडणगड या मार्गावर तसेच तालुकांतर्गत फेऱ्या चालवल्या जातात. आगाराला सध्या ८० बसेसची मागणी असताना अवघ्या ७० शिवशाही व साध्या प्रकारातील बसेस उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे अनेक बसेसचे आर्युमान हे १५ वर्षापेक्षा जास्त झालेले आहे. त्याचप्रमाणे बसेसची दुरवस्था झाली असून, अनेक बसेसच्या खिडक्या तुटलेल्या आहेत तर काहींची आसने गायब आहेत. त्यामुळे गेली दोन वर्षे सातत्याने दापोली तालुका मराठी पत्रकार परिषद व दापोली मंडणगड प्रवासी मित्र संघटना ही दापोली आगाराला नव्या प्रकारातील बसेस मिळाव्यात यासाठी मध्यवर्ती कार्यालयापासून स्थानिक पातळीपर्यंत मागणी करत आहेत. दर महिन्याला होणाऱ्या प्रवासी राजा दिनावेळी सातत्याने नवीन बसेसची मागणी ही या संघटनेकडून केली जात आहे. काही दिवसांपूर्वा दापोलीचे आगारप्रमुख उबाळे यांनी नव्या बसेस या लवकरच येतील, असे सांगितले असतानाच आज १७ जानेवारीला कुर्ला नेहरूनगर व परळ आगारातून आयशर कंपनीच्या सहा बसेस हस्तांतरित केल्या आहेत.

आयशर कंपनीच्या बसेस या कोकण विभागातील फक्त शहरी भाग असलेल्या आगारामध्ये विशेषतः मुंबई व परिसरात कार्यरत आहेत. मुंबई व परिसरातील आगारांमधील या कंपनीच्या बसेसना आठ वर्षे पूर्ण झाल्याने व मुंबई परिसरासाठी कडक निर्बंध असल्याने या बसेस कोकणामध्ये पाठवण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. नव्या बसेसची मागणी असताना जुन्या बसेस का देण्यात आल्या?

अनेक बसेस काढणार स्क्रॅपमध्ये
रत्नागिरी विभागातील अनेक बसेस या १५ वर्षांपुढील असून, शासनाच्या निकषानुसार त्या स्क्रॅपमध्ये काढण्यात येणार आहेत. त्यामुळे आगारातील दररोजची सेवा सुरू राहण्यासाठी मुंबई व अन्य विभागातून बसेस हस्तांतरित होत आहेत; मात्र असे असले तरी विभागाच्यावतीने नव्या बसेसची सातत्याने मागणी केली जात असून, लवकरच रत्नागिरी विभागाला नव्या बसेस या मिळतील, असे रत्नागिरी विभागाचे डीटीओ यादव यांनी सांगितले.

रत्नागिरी विभागाला लवकरात लवकर बसेस मिळाव्यात यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दापोली आगारामध्ये सध्या शिवशाही व साध्या अशा मिळून ७० बसेस असून दापोली आगराला किमान एकूण ८० बसेसची आवश्यकता आहे. आपण वरिष्ठांकडे २० नव्या बसेसची मागणी केली असून, पहिल्या टप्प्यात १० बसेस येण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक प्रकारातील सुमारे ३६ बस पुढच्या २ महिन्यात दापोली आगराला मिळण्याची शक्यता आहे. प्रवाशांना जास्तीत जास्त सुखकर, आरामदायी व सुरक्षित सेवा देण्यासाठी दापोली आगार प्रयत्नशील आहे. – राजेंद्र उबाळे, आगारप्रमुख, दापोली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 18-01-2025