रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील बाजारपेठेमध्ये गावठी नारळांची आवक घटली आहे. त्यामुळे नारळांची किंमतही वाढली आहे. माडावर चढून नारळ काढणारे मिळत नसल्याने आणि पश्चिम महाराष्ट्रातून नारळ मागविले जात नसल्याने गावठी नारळाचे दर वाढले आहेत.
रत्नागिरी शहरातील नवीन आणि जुनी भाजी मार्केट इमारत पाडण्यात आली आहे. त्याठिकाणी नवीन इमारती उभ्या राहणार आहेत. या मार्केटमधील व्यापारी पश्चिम महाराष्ट्रातून नारळ मागवून विकत होते. परंतु पश्चिम महाराष्ट्रातील नारळ जुना असल्याने नारळाला तडे जाण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे नुकसान होत असल्याने आता पश्चिम महाराष्ट्रातून नारळ मागविले जात नसल्याचे माजी व्यावसायिक भोळे यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यात नारळाच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. गुहागर पाठोपाठ रत्नागिरी तालुक्यात माड किंवा नारळाची झाडे आहेत. परंतु माडावर चढून नारळ काढणारे मिळत नसल्याने शहराच्या बाजारपेठेत येणारे गावठी नारळाचे प्रमाण घटले आहे. परिणामी, गावठी नारळाचे दर फारच वधारले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 04/Feb/2025














