राई बंदरात ‘उमेद’च्या हाऊसबोटीचे उद्घाटन

रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि सिंधुरत्न समृद्ध योजननेतून 24 पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी उमेद अंतर्गत महिला प्रभाग संघांना देण्यात येणाऱ्या हाऊस बोटीचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राई बंदरात गुरुवारी झाले.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधून कर्ज घेतल्यास ३५ टक्के सब्सिडी दिली जाते. महिला भगिनींनी कर्ज घेऊन उद्योग उभे करावेत. तो वाढवून रोजगार निर्मिती करावी, त्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. सामंत यांनी यावेळी केले. फीत कापून हाऊस बोटीचे उद्घाटन केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना श्री. सामंत पुढे म्हणाले, स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी बचतगटांच्या माध्यमातून देशात पहिल्यांदा हाऊस बोट आज येथे सुरू होत आहे. जिल्ह्यामध्ये अशा आणखी ४ हाऊस बोटी येणार आहेत. हा प्रकल्प अतिशय चांगला आहे. निसर्गरम्य वातावरणात तो निश्चितपणे देशात आदर्शवत ठरेल. हा रत्नागिरी पॅटर्न राबविण्यासाठी सर्वजण पुढाकार घेतील. काश्मीर आणि केरळनंतर रत्नागिरीतही हाऊस बोटी आहेत, असे अभिमानाने सांगता येईल. महिला प्रभाग संघांना देण्यात आलेली टुरिस्ट वाहनेही सातत्याने आरक्षित असतात. आणखी ६ वाहने द्यायची आहेत. ही वाहने चालविणारे चालक व वाहक दोघीही महिला असाव्यात. त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी माझी राहील.

सध्याच्या युगात महिला पायलट सर्वांत उत्तम विमाने चालवत आहेत. त्याप्रमाणे हाऊस बोटीची कॅप्टनदेखील महिला असावी. जिल्ह्यामध्ये सुरू केलेले उपक्रम पुढे चालू ठेवणे हीदेखील आपली जबाबदारी आहे. महिला भगिनींनी उद्योगधंद्यांकडे वळले पाहिजे, त्यासाठी मानसिकता असावी. हाऊस बोटीच्या प्रकल्पाजवळ खाऊ गल्ली तयार करावी. त्यासाठी पुढाकार घ्यावा. न्याहारी निवास योजना चळवळ म्हणून राबविण्यासाठी उमेदने पुढाकार घ्यावा. त्यामध्ये महिलांनी चांगले काम करावे, असेही पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, डीआरडीएचे प्रकल्प संचालक विजय जाधव, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, बाबू म्हाप, बिपीन बंदरकर, विजय पाटील, सतीश शेवडे, सरपंच श्रृती शितप आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला एकता महिला प्रभाग संघाच्या स्वरा देसाईंसह विविध बचतगटांचा महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 21-02-2025