लांजा : व्यापार व व्यवसायासाठी येणाऱ्या बांगलादेशीय घुसखोरांवर कारवाई करण्याची मागणी

लांजा : व्यापार, व्यवसाया निमित्ताने लांजा शहर व तालुक्यात येणाऱ्या, भाडेतत्त्वावर राहणार्या आणि बाजारपेठ व विविध व्यवसायिक क्षेत्रात हस्तक्षेप करणाऱ्या बांगलादेशीय घुसखोरांची माहिती घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान लांजा विभाग यांच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबतचे निवेदन लांजा नगर पंचायत., तहसिलदार, पोलीस ठाणे यांना सादर करण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणावर भारतात घुसले आहेत व मोकाट फिरत आहेत. बांगलादेशातील हे रहिवासी आपल्या भारत देशातील विविध शहर तसेच खेडेगावांत मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत होत आहेत. व तेथील बाजारपेठ व विविध व्यवसायिक क्षेत्रात हस्तक्षेप करीत आहेत. तसेच खोट्या कागदपत्रांच्या आधारे सरकारी योजनांचा लाभ घेत असून सरकारची दिशाभूल करीत आहेत. तसेच सामाजिक कार्यक्रमात हस्तक्षेप करुन स्थानिक मुस्लिमांना भडकवण्याचे काम देखील हे घुसखोर करीत आहेत. यांच्यामुळे सामाजात तेढ निर्माण होऊन अनुचित प्रकार घडण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. आपल्या येथील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील अश्या प्रकारचे घुसखोर असल्याची माहिती आपणा सर्वांना आहेत व अश्या घुसखोरांना याआधी पकडले देखील आहे.

लांजा नगरपंचायत हद्दीत बाहेरुन स्थलांतरीत होणा-यांची संख्या दिवसें दिवस वाढतच आहे. यामुळे अनाधिकृत वस्त्या व व्यवसाय वाढत आहेत. याचा परिणाम स्थानिक व्यापा-यांवर व बाजारावर होत आहे. या घुसखोरांमुळे चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे. बांगलादेशात हिंदुवरील अत्याचार लक्षात घेता बांगलादेशातील घुसखोरांवर कोणतीही कारवाई होत नाही आहे हे अत्यंत लज्जास्पद आहे.

त्यामुळे लांजा शहर व तालुक्यात भाडे तत्वावर राहणा-या व आठवडा बाजार तसेच इतर दिवशी बाहेरुन येणा-या व्यापारी व त्यांच्या कामगारांचे सर्वांची योग्य ती कागदपत्रे तपासुन ते भारतातीलच रहिवासी आहेत का याची खात्री करुन घ्यावी. तसेच भाडेतत्वावर ठेवणा-या मालकांनी देखील भाडेकरूंची संपूर्ण माहिती नगरपंचायत व पोलीस ठाण्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात यावेत. यामध्ये कोणतीही दिरंगाई करु नये व तात्काळ कारवाई करण्यात यावी. सदर कारवाई कोणत्याही समाज अथवा धर्माशी निगडीत नसून देशद्रोह्यांच्या विरोधात आहे. याला कोणतेही धार्मिक रंग देण्यात येऊ नये. तसेच घुसखो-यांवर व त्यांना आश्रय देणा-यांवर कडक कारवाई करुन सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन सादर करताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान लांजा विभाग धारकरी श्रेयस शेट्ये, सचिन कदम, सुशांत रहाटे, रुपेश चव्हाण, अजय सावंत, प्रवीण पावसकर, परशुराम गुंजीकर, अनिकेत शेट्ये, ओम कुंभार, उदय शिंदे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिवप्पा उकळी, माजी नगरसेवक मंगेश लांजेकर, विश्व हिंदू परिषदेच्या सत्संग प्रमुख मनिषा घाटे, सनातन संस्थचे समीर घोरपडे व इतर धर्माभिमानी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:48 PM 28/Feb/2025