शेतकऱ्यांना सरसकट काजू अनुदान मिळावे : अतुल काळसेकर

रत्नागिरी : गोवा काजू बागायतदार संघ सर्व शेतकऱ्यांची काजू बी खरेदी करतो आणि शेतकऱ्यांना प्रति किलो १० ते १५ रुपये अनुदान गोवा सरकार काजू बागायतदार संघटनांना देते. तसे अनुदान महाराष्ट्रातही दिले पाहिजे, ही आपण केलेली मागणी मान्य झााली, त्यासाठी २०० कोटी आले. पण आपलं दुर्दैव असे आहे की, ते वाटायचे कसे, याच्यावर कोणताही तोडगा काढता आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट अनुदान मिळाले पाहिजे, अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केली.

शिरगाव मत्स्य महाविद्यालय येथे रविवारी आयोजित ‘काजू उत्पादक आणि प्रक्रियादारांच्या समस्या’ यावर तोडगा काढण्यासाठी बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी काजू प्रक्रिया क्लस्टर ज्येष्ठ उद्योजक जयवंत तथा दादा विचारे, भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे, जिल्हा कृषी अधीक्षक शिवकुमार सदाफुले, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक मिलींद जोशी, विवेक अत्रे, धनंजय यादव, अमित आवटी, शैलेश दरगुडे, गणेश बांदरकर, सुनील देसाई, रवींद्र अमृतकर आदी उपस्थित होते.

यावेळी जयवंत तथा दादा विचारे म्हणाले की, कोकणातला काजू हा चवीला तर उत्तम आहेच. परंतु, त्याचे स्ट्रक्चर खूपच चांगले आहे. काजूचे महाराष्ट्राचे उत्पादन अडीज लाख टन आहे. मात्र, त्याचे मार्केटिंग व प्रक्रियेमध्ये आपण खूप मागे आहोत. त्यामुळे काजू प्रक्रिया उद्योजकांना व काजू उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा केली. व्यक्त केली.

काजू प्रक्रिया उद्योजकांच्या प्रमुख मागण्या
१६ फेब्रुवारी २०२३ च्या काजू फळपीक योजनेच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी
१६ मे २०२३ च्या निर्णयानुसार काजू मंडळ स्थापन झाले; पण कामकाज सुरू झालेले नाही
सिंधुरत्न समृद्ध योजनेची मुदत १० वर्षे वाढवून काजू उद्योजकांना चालना द्यावी
भांडवलाचा योग्य व सुरळीत पुरवठा व्हावा

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 11/Mar/2025