महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरवा : अॅड. विलास पाटणे

रत्नागिरी : कोकणातील सर्व प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी कोकणातील पाण्याचा प्रश्न आधी सोडवला, तर लाल मातीच्या ऋणातून मुक्त होतील. कोकणातील आयाबहिणींच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरवा आणि मगच मराठवाड्याला पाणी द्या, अशी प्रतिक्रिया रत्नागिरीतील अभ्यासक अॅड. विलास पाटणे यांनी व्यक्त केली.

कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून ५४.७० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार असून, त्यामधून मराठवाड्यातील सुमारे २ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल. या प्रकल्पाचे सर्वेक्षण व अन्वेषणाचे काम सुरू आहे, असे काल राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. याबाबत अॅड. पाटणे म्हणाले, कोकणातील उल्हास (ठाणे) आणि वैतरणा (पालघर) या नद्यांमधील ५४.७० टीएमसी पाणी मराठवाड्याच्या गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा मनोदय राज्य शासनाकडून व्यक्त केला जात आहे. कोकणातील पाणी गोदावरीत नेणे आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या परवडणारे नाही. समुद्रसपाटीपासून कोकणची उंची सर्वसाधारणपणे ८० मीटर, तर मराठवाड्याची उंची ५६८ मीटर आहे. कोकणच्या वाट्याचे पाणी वळवले तरी मराठवाडा अखेर तहानलेलाच राहील.

कोकणची गरज भागवून मराठवाड्याला प्यायला पाणी देणे न्यायाचे होईल; परंतु पाणी उसासाठी देणे कोकणवर अन्याय केल्यासारखे होईल. पाणी ज्या प्रदेशातून वाहते तेथील जनतेचा पाण्यावरचा समान हक्क ‘रिपरिअन राइट’ प्राधान्याने मान्य केला पाहिजे. रत्नागिरी शहराला केवळ ०.१५ टीएमसी पाण्याची गरज आहे. कोकणातील आया बहिणींच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरवण्यासाठी कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्यायाची भूमिका घेतील, ही कोकणवासीयांची रास्त अपेक्षा आहे. जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी असं म्हटल होतं की, पशुपालनाच्या क्षेत्रात मराठवाडा डेन्मार्क बनू शकण्याची क्षमता आहे. दुधाच्या व पशूपालनाच्या व्यवसायात आर्थिक प्रगती असताना आपण उसाच्या मृगजळाच्या मागे लागली आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या प्रकल्पावर एक लक्ष कोटींपैकी लाभ मुख्यत्वे ५ टक्के शेतकरी व १० टक्के लोकसंख्येला होतो. कोकणातील महिला हंडाभर पाण्याकरिता १ ते २ किलोमीटर उन्हातून पायपीट करते. याची वेदना कोणालाच नाही.

वाशिष्ठीच्या पाण्याचा निर्णय प्रलंबित
कोयना धरणाचे काम पूर्ण होऊन ५० वर्षे होत आली आहेत. हेळवाक येथून वाशिष्ठी नदीत वाहून जाणारे पाणी साधारणः १९०० दशलक्ष घनमीटर इतके आहे. १९५२ मध्ये पंडित नेहरू यांनी वीजनिर्मितीनंतर कोकणात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा उपयोग कसा करायचा, हा मूलगामी प्रश्न विचारला होता, त्याचे उत्तर कोकणी माणूस अद्याप शोधतो आहे. वाशिष्ठीचे पाणी पिण्याकरिता व सिंचनाकरिता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुरवण्यासाठी शासनाने गांभीर्याने विचार केला पाहिजे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 13/Mar/2025