रत्नागिरी : जिल्ह्यातील ८ हजार ४०५ निरक्षर देणार सारक्षतेची परीक्षा

रत्नागिरी : जिल्ह्यातील असाक्षरांना साक्षर करण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत २३ मार्च रोजी परीक्षा होणार आहे. या परीक्षेतून नवसाक्षरांची साक्षरता तपासणी केली जाणार आहे. या परीक्षेला ८ हजार ४०५ इतके जण बसणार आहेत.

केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम सन २०२२-२३ ते सन २०२६-२७ कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ज्या शाळेतून उल्लास अॅपवर असाक्षर व्यक्तींची नोंदणी केलेली आहे व १७ मार्च रोजी झालेल्या परीक्षेत असणारे असाक्षर अशा सर्वांना रविवार २३ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत जाऊन पायाभूत चाचणी परीक्षा द्यावी. नोंदणीकृत असाक्षर व्यक्तींना परीक्षा केंद्रावर उपस्थित ठेवण्यासाठी शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्र प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, स्वयंसेवक यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, असे आवाहन शिक्षण संचालनालय (योजना) यांच्याकडून करण्यात येत आहे.

परीक्षेस जाताना शक्य असल्यास असाक्षर व्यक्तीने स्वतःचा एक आयकार्ड साईज फोटो नोंदणी फॉर्मवर लावण्यासाठी आणावा (फोटोबाबतची सक्ती करु नये) तसेच जन्मतारखेचा पुरावा म्हणून असाक्षर व्यक्तीचे स्वतःचे मतदान ओळखपत्र / आधार कार्ड/पॅनकार्ड/ बैंक पासबुक इत्यादीपैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे. जेणेकरुन उत्तर पत्रिकेतील प्रथम पानावरील माहिती भरणे तसेच असाक्षर व्यक्तींचा परीक्षा नोंदणी अर्ज भरणे शक्य होईल.

प्रश्नपत्रिका ही पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित खालील तीन भागांमध्ये विभागलेली असून एकूण १५० गुणांची आहे. अनुक्रमे भाग-क (वाचन) ५० गुण, भाग ख (लेखन) ५० गुण, भाग ग (संख्याज्ञान) ५० गुण. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के (१७गुण) अनिवार्य आहेत व एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के (५१ गुण) असतील. कोणत्याही एका भागाचे ३३ टक्के गुण होण्यासाठी कमी पडलेले जास्तीत जास्त ५ वाढीव गुण देता येतील. परंतु तीनही भागाचे मिळून ५ पेक्षा जास्त गुण देता येणार नाहीत.

परीक्षेची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असेल. प्रत्यक्ष पेपरचा कालावधी ३ तासांचा असेल (दिव्यांग व्यक्तींसाठी ३० मिनिटे जादा वेळ) परीक्षार्थी परीक्षासाठी वरील कालावधीत कधीही येऊ शकेल. जिल्ह्यातील ८ हजार ४०५ जण या परीक्षेला बसणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली.

साक्षरतेचे मिळणार गुणपत्रक
‘साक्षरतेतून समृद्धीकडे’ या संकल्पनेतून केंद्र शासनाने हाती घेतलेल्या नवभारत साक्षरता कार्यक्रमांची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू आहे. ज्यांना साक्षर केले आहे, अशांची परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर असाक्षरांना केंद्र सरकारकडून प्रमाणपत्र, गुणपत्रक देण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 18/Mar/2025