संगमेश्वर : प्रचितगड किल्ल्याच्या बुरुजांना नवा साज

संगमेश्वर: महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी सुरू केलेल्या श्रमदान मोहिमेत प्रचितगड किल्ल्यांवरील बुरुजांना नवा साज देण्यात आला आहे. ही मोहीम संगमरत्न फाउंडेशन (एनजीओ) आणि गडकरी परिवाराने दुसऱ्यांदा फत्ते केली. ४० दुप्रिमींचा सहभाग असलेल्या या मोहिमेत किल्ल्यांच्या पायथ्यापासून ते शिखरापर्यंतच्या वाटेवर दिशादर्शक फलक लावण्यात आले. या मोहिमेत इतिहास संशोधक, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. काही महिन्यापूर्वी संगमरत्नतर्फे राबवलेल्या पहिल्या मोहिमेत किल्ल्याची स्वच्छता आणि पायवाट व्यवस्थित केली गेली होती. दुसऱ्या मोहिमेत मातीखाली गेलेल्या किल्ल्यावरील बुरुजाला नवा साज देण्यावर भर दिला गेला.

खिंडीमधून शिडी वापर करून गडाकडे येताना कातळात कोरलेल्या १० ते १२ पायऱ्या चढल्यानंतर दरवाजाचे अवशेष दिसतात. दरवाजाची कमान अस्तित्वात नसली तरीही कमान ज्या खांबांवर उभी होती ते खांब उभे आहेत. दरवाजामधून गडावर प्रवेश केल्यानंतर समोर पाण्याची टाकी आणि डाव्या बाजूला भक्कम बुरूज दिसतो. दगडमातीने तो झाकला गेला होता. जवळजवळ ७ ते ८ फूट खोल आणि त्यावरील वाढलेल्या झाडीझुडपांमुळे बुरूज कोंडलेला होता. तेथील माती काढून टाकण्यात आली आहे. पाण्याच्या टाकीमधील अस्वच्छ पाण्याचा उपसा करण्यात आला. तसेच किल्ल्याचा पायथा ते गडाकडे जाणाऱ्या वाटेवर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. गडावरील भैरीभवानी मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. गडावरील वाटा झाडेझुडपांनी वेढल्या होत्या. त्या मोकळ्या करण्यात आल्या.

मोहिमेसाठी आमदार शेखर निकम यांच्यासह शृंगारपूर गावातील मनेश मस्के यांचे सहकार्य लाभले. गार्डी विद्यालयाचे शिक्षक जाधव, तांबे यांच्याकडून गडावर संवर्धनासाठी लागणाऱ्या वस्तू टिकाव, फावडे आणि १० घमेली देण्यात आली. मुकुंद सनगरे यांनी ग्रीन नेट दिले. या वेळी अविनाश घडशी उपस्थित होते

काही ऐतिहासिक पाने..
संगमेश्वर तालुक्यामधील किल्ला महाराणी येसूबाई याच्या शृंगारपूर गावाजवळून ५४० मी. उंचीवर आहे. प्रचितगड या किल्ल्याचा उचितगड या नावाने अनेक ऐतिहासिक कागदपत्रांत उल्लेख आलेला दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी एप्रिल १६६१ मध्ये सूर्यराव सुर्वे यांच्यावर स्वारी करून प्रचितगड जिंकून घेतला होता.

या मोहिमेच्या यशस्वीतेमुळे श्री प्रचितगड व इतर किल्ल्यांची संरचना टिकवून ठेवता येईल आणि त्यांचा पर्यावरणीय व सांस्कृतिक वारसा जपला जाऊ शकतो- अल्पेश सोलकर, संगमरत्न फाउंडेशन (एनजीओ), संगमेश्वर-मुंबई

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 28/Mar/2025