मुंबई : दिल्लीमध्ये होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bhartiy Sahitya Sammelan) अध्यक्षपदी लोकसंस्कृती आणि संत साहित्याचे अभ्यासिका डॉ. तारा भवाळकर (Dr. Tara Bhawalakar) यांची निवड करण्यात आली.
रविवारी पुण्यातील साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी ही निवड केली.
राजधानी दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अनेकांची नावे पुढे येत होती. संमेलनाध्यक्षपदासाठी डॉ. तारा भवाळकर यांचे नाव आघाडीवर होते. यानंतर प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे, समाजसेवक अभय बंग आदींच्या नावांचीही चर्चा होती. डॉ. तारा भवाळकर, विश्वास पाटील यांची नावे शेवटपर्यंत कायम राहिले. त्यामध्ये भवाळकर यांच्या नावाला एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आलं.
संमेलनाध्यक्षाची निवड करण्यासाठी साहित्य महामंडळाने शनिवारी (दि. 5) आणि रविवारी (दि. 6) पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक घेतली. या बैठकीत अनेक नावांवर चर्चा झाली. त्यात महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह घटक संस्था, संलग्न संस्था आणि समाविष्ट संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. घटक संस्थांकडून साहित्य महामंडळाकडे प्राप्त झालेल्या नावांवर चर्चा करून भवाळकर यांची निवड करण्यात आली.
ताराबाई या लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला यांच्या गाढ्या अभ्यासक आहेत. लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संत साहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला, लोकसाहित्य यावर त्यांनी भरपूर संशोधन व लेखन केले आहे.
गाजलेली पुस्तके
तिसऱ्या बिंदूच्या शोधा, प्रियतमा, मरणात खरोखर जग जगते, मराठी नाटक : नवी दिशा, नवे वळण, मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि अभिरुची, यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा, लोक परंपरा आणि स्त्री प्रतिभा ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत.
1 एप्रिल 1939 रोजी जन्मलेल्या ताराबाई वयाच्या 83 व्या वर्षीही लेखन करत असतात. साठ वर्षांहून अधिक काळ त्या सातत्याने साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. मराठीतील नामवंत लेखिका, प्राध्यापिका, एक कसदार वक्त्या अशी त्यांची विविधांगी ओळख आहे.
ताराबाईं भवाळकरांनी 1958 ते 1970 पर्यंत माध्यमिक विद्यालयात शिक्षिका म्हणून काम केले. 1970 ते 1999 पर्यंत सांगलीच्या श्रीमती चंपाबेन यांनी वालचंद शहा महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापिका म्हणून काम केले.निवृत्त झाल्यावर पुण्यातील ललित कला अकॅडमी आणि मुंबई विद्यापीठ लोककला अकॅडमीमध्ये त्यांनी अतिथी प्राध्यापिका म्हणूनही काम केलं.
अनेक पुरस्कारांनी ताराबाई भवाळकरांचा गौरव…
ताराबाई भवाळकरांच्या कार्याचा गौरव विविध संस्थांनी केला आहे. यामध्ये लेखन आणि संशोधनासाठी महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वि.मा. गोखले पुरस्कार, मसाप गौरव पुरस्कार, पुणे नगर ग्रंथालयाचा श्री. ना. बनहट्टी पुरस्कार, मुंबई विद्यापीठाचा डॉ. अ. ना. प्रियोळकर पुरस्कार यासारख्या आदी पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला. याशिवाय, महाराष्ट्र फाऊंडेशनने त्यांना गेल्या वर्षी पुण्यात जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:03 07-10-2024
