Ratnagiri : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंब्याच्या ४० हजार पेट्या मुंबईला रवाना

रत्नागिरी : दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूस आंबा विक्रीसाठी बाजारात दाखल होतो. यावर्षीही गुढीपाडव्याला मुंबईतील वाशी बाजारपेठेत ४० हजार आंबा पेट्या पाठविण्यात आल्या आहेत.

या आंबा पेट्यांची बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी विधिवत पूजा केल्यानंतर पेट्यांचा लिलाव करण्यात आला. सध्या दोन हजार ते पाच हजार रुपये पेटीचा दर आहे.

यावर्षी नैसर्गिक बदलामुळे आंबा उत्पादन ३० ते ३५ टक्के इतकेच आहे. वाशी बाजारात जानेवारीपासून आंबा दाखल झाला असला तरी त्याचे प्रमाण कमी हाेते. त्यातच उष्मामुळे आंबा भाजला, गळही झाली. परंतु, १५ मार्चनंतर जसा आंबा तयार हाेईल तसा बाजारात पाठविला जाऊ लागला.

मात्र, काही बागायतदार गुढीपाडव्याला आंबा बाजारात आणून व्यवसायाचा मुहूर्त करतात. त्यानुसार शनिवारी (दि.२९ मार्च) काढलेला आंबा रविवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाशी बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्यात आला. रविवारी सुटी असूनही पाडव्यामुळे बाजारपेठ सुरू होती. त्यामुळे बाजारात आलेल्या आंब्याची विधिवत पूजा केल्यानंतर लिलाव करण्यात आला. या पूजेसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, विक्रेते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 31-03-2025