आपत्ती रोखण्यासाठी चिपळूण पालिका ‘सतर्क’

चिपळूण : पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरात पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी पालिका प्रशासन अॅक्शन मोडवर आली आहे. पावसाळ्यापूर्वी आपत्तीविषयक कामे निश्चित करून ती मार्गी लावली जात आहेत. नालेसफाईबरोबरच राष्ट्रीय महामार्गावरील गटारांच्या स्वच्छतेकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. त्यामुळे पाणी तुंबून शहरवासीयांना त्रास होणार नाही या दृष्टीने पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. तसेच कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी शहरातील मोठे नाले व वहाळांचे कॉक्रिटीकरण केले जाणार आहे.

प्रांताधिकारी आकाश लिगाडे मुख्याधिकारी विशाल भोसले, तहसीलदार प्रवीण लोकरे आदींनी पावसाळ्यापूर्वी दोन महिने आधी आपत्ती व्यवस्थापन केली त्यामध्ये नागरिकांशी संवाद साधला गेला. त्यांनी केलेल्या सुचेनुसार शहर स्वच्छतेच्या नियोजन करण्यात आले.

शहरातील १५ ठिकाणी निश्चित करून तेथे तीन टप्पात कामे केली जाणार आहेत. चार ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्याचे काम सुरूः केली आहे. शहरातील नाले, वहाळ, गटारांची स्वच्छतामोहीम हाती घेतलेली आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील ५२ नाल्यांची सफाई करण्यासाठी १९ पथके तैनात केली आहेत, त्यामुळे काम वेगाने सुरू झालेले आहे. नालेसफाईवेळी जिथे जेसीबी पोहोचत नाही. तेथे कामगारांकडून सफाई करवून घेतली जाणार आहे. प्रांत कार्यालयासमोरील जागेचे सपाटीकरण केले असून, तिथे नागरिकांची वाहने उभी केली जाणार आहेत शहराबरोबरच गावस्तरावर आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रांताधिकारी लिगाडे यांनी बैठका घेणार आहेत.

पावसाळ्यापूर्वी शहरातील आपत्तीशी निगडित कामे मार्गी लागतील, असे प्रयाण सुरू आहेत, शहरातील नालेसफाईची कामे सुरू केरली आहेत. शहरातील मोठे नाते, पऱ्यांचे कॉक्रिटीकरणाचे नियोजन असून त्यासाठी ४० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. त्यालाही मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे, मोठ्या नाल्यांचे काँक्रिटीकरण केल्यामुळे त्यावर अतिक्रमण होणार नाही शिवाय पावसाचे पाणी गतीने वाहून जाईल. पुरावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नदीकिनारी १९ ठिकाणी संरक्षण भिंती उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी १०६ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरवासीयांना पावसाळ्यात पाणी तुंबून होणारा त्रास सहन करावा लागणार नाही. त्यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत, असे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी सांगितले.

चिपळूण परिसरात २०२१ मध्ये आलेल्या महापुराचा नागरिकांना मोठा फटका बसला. अशा आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी दोन महिने अगोदर आपत्तीविषयक कामे सुरू केली आहेत. सर्वच शासकीय विभागांमध्ये सलोख्याने आणि समन्वयकातून कामे सुरू आहेत. मागील दोन वर्षात पावसाळ्याच्या कालावधीत प्रशासनाकडून आवश्यक ती दक्षता घेतल्यामुळे पूरस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागला नव्हता. पावसाळ्यात पाणी साचून राहणाऱ्या ठिकाणी काम सुरू आहेत. आकाश लिगाडे, प्रांताधिकारी, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 11/Apr/2025