रत्नागिरी : गोखले नाका ते मारुती आळी मार्गे वाहनांना शनिवारी वाहतुकीसाठी प्रतिबंध

रत्नागिरी : 12 एप्रिल रोजी संपूर्ण दिवस गोखले नाक्याकडून मारुती आळी मार्गे जाणा-या व येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना या रस्त्यावरती प्रवेश प्रतिबंध करणे आवश्यक आहे. सदर मार्गाला जाण्यायेण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून गोखले नाका सुखधाम हॉटेल समोरुन प-याची आळी, गोखले नाका-काँग्रेस भवन मार्गे-आठवडा बाजार या पर्यायी मार्गे वाहतुक वळविण्यात यावी, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी मारुती बोरकर यांनी दिले आहेत.

श्री मारुती मंदिर संस्था, मारुती आळी, रत्नागिरीच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव 12 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. उत्सव कालावधीमध्ये मंदिरात भाविकांची अलोट गर्दी होत असते. मंदिरासमोरील रस्त्यावर श्रींचा रथ व सजावटीच्या गाड्या उभ्या असतात. मारुती आळी येथील रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतुकीला/रहदारीला अडथळा निर्माण होणार आहे. श्री हनुमान जन्मोत्सव कालावधीत सदर रस्त्यावर वाहनांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असून, अशा वेळी पार्किंगचा प्रश्न निर्माण होवू शकतो अगर वाहतूक कोंडी होऊन कायदा य सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 115 प्रमाणे वाहतुक बंद करण्याबाबत अपर जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशित केले आहे त्यानुसार वाहतुकीची कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता योग्य नियोजन करण्यात यावे. वाहतुक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारणेची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:11 11-04-2025