दापोलीतील आंजर्ले समुद्रकिनारी कासव महोत्सव सुरू

दापोली : दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवांच्या जन्माचा महोत्सव सुरू झाला आहे. १० एप्रिल ते १० मे असा महिनाभर आहे. आंजर्ले किनारी भेट देणाऱ्या पर्यटकांसह स्थानिकांना हा महोत्सव पर्वणी ठरला आहे. गुरुवारी दि. १० एप्रिलपासून या महोत्सवाचा प्रारंभ झाला आहे. या दिवशी सकाळी पर्यटक आणि स्थानिक यांच्या समक्ष पाच ऑलिव्ह रिडले कासवाची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली.

एप्रिल व मे महिन्यात पर्यटकांची समुद्रकिनाऱ्यांवर मोठी गर्दी असते. अशावेळी पर्यटकांनादेखील कासवांच्या पिल्लांच्या जन्माचा आनंद घेता येऊ लागला आहे. आंजर्लेकिनारी कासव बचाव मोहिमेअंतर्गत संवर्धन करण्यात आलेल्या अंड्यांमधून पिल्ले बाहेर येण्यास प्रारंभ झाला आहे. या हंगामात या किनाऱ्यावर ४३ कासवांची घरटी आढळून आली असून, त्यातील ६,४९० अंडी संरक्षित करण्यात आली आहेत.

कासव महोत्सवाअंतर्गत संवर्धित अंड्यांमधून बाहेर आलेली कासवाची पिल्ले समुद्रात सोडतानाचा क्षण हा पर्यटकांसाठी पर्वण ठरत आहे. गुरुवारी कासवाची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली त्यावेळी सरपंच मेघना पवार, उपसरपंच प्रथमेश केळसकर, कांदळवन समिती अध्यक्ष संदेश देवकर, वनरक्षक शुभांगी गुरव, सहाय्यक उपजिविका तज्ज्ञ अभिनय केळसकर, प्रकल्प सहाय्यक क्रांती मिंडे, कासवमित्र अजिंक्य केळसकर, सूजन खेडेकर, सुयोग मयेकर व पर्यटक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:58 AM 12/Apr/2025