रत्नागिरीत अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची धडक कारवाई : 31 गुन्ह्यांत 50 आरोपींवर कारवाई, 7 तडीपार

रत्नागिरी, 12 एप्रिल 2025: रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थांच्या व्यापारावर कठोर कारवाई करत 2024 आणि 2025 मध्ये एकूण 31 गुन्ह्यांमध्ये 50 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये 7 आरोपींना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.

2024 मधील कारवाईचा आढावा

2024 मध्ये 25 गुन्हे दाखल झाले असून, 39 आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये 7 लाख 15 हजार 650 रुपयांचे 231 ग्रॅम ब्राऊन हेरॉईन, 6 लाख 66 हजार 54 रुपयांचा 32,858.5 किलोग्रॅम गांजा आणि 50 लाख 89 हजार 600 रुपयांचे 12.720 किलोग्रॅम चरस जप्त करण्यात आले.

2025 मधील कारवाई

2025 मध्ये आतापर्यंत 6 गुन्ह्यांमध्ये 11 आरोपींना अटक झाली आहे. यामध्ये 2 लाख 26 हजार 250 रुपयांचे 25.4 ग्रॅम ब्राऊन हेरॉईन आणि 3 लाख 76 हजार 197 रुपयांचा 7,616.5 किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांचा कठोर पवित्रा

रत्नागिरी पोलिसांनी अंमली पदार्थांचे जाळे समूळ नष्ट करण्यासाठी धडक कारवाई सुरू केली आहे. क्षेत्रीय पोलीस अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे या मोहिमेत सहभागी झाले आहेत. “आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे काम तीव्र गतीने सुरू आहे,” असे पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:36 12-04-2025