रत्नागिरी : पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा- विश्व हिंदू परिषद

रत्नागिरी : पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायदा दुरुस्तीला विरोध आंदोलनाच्या नावाखाली हिंदूंवर होणारे अत्याचार वाढत आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद कोकण प्रांतातर्फे राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे.

यासंबंधीचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे देण्यात आले.

विश्व हिंदू परिषदेकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना यांना पश्चिम बंगालमधील या हिंसाचाराचा बीमोड करण्यासाठी कठोर भूमिका घेण्याबाबत निवेदनात विनंती केली आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट त्वरित लागू करण्यात यावी, अशी विनंती करणारे निवेदन प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, वक्फ कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार घडवून आणला जात आहे. हिंदूंना त्रास दिला जात असून बंगालमधील स्थिती गंभीर झाली आहे. ११ एप्रिल रोजी मुर्शिदाबाद येथे हिंदूंवर अत्याचार करण्यात आले. हिंदूंची घरे जाळण्यात आली. महिलांवर अत्याचार करण्यात आले. यामुळे ५०० हून अधिक हिंदू कुटुंबांनी मुर्शिदाबादमधून पलायन केले आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत. बंगालमध्ये राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आहे. बंगालमध्ये केंद्रीय सुरक्षा दलांकडे सुरक्षा व्यवस्था सुपूर्द करा. तसेच एनआयएद्वारे तपास व्हावा. पश्चिम बंगालमध्ये रोहिंग्यांची घुसखोरी होत आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट जारी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:05 21-04-2025