कोयना अवजल मुंबईकडे वळविण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून चाचपणी..

चिपळूण : कोयना धरणातील वीजनिर्मितीनंतर वाशिष्ठी नदीमार्गे अरबी समुद्रात सोडले जाणारे ६७ टीएमसी अवजल मुंबईकडे वळविण्याचा प्रस्ताव आहे. त्यादृष्टीने आता पाटबंधारे विभागाकडून चाचपणी सुरू आहे.

पाणी वापराकरिता पूर्व व्यवहार्यता अहवाल तयार करण्यास कळंबस्ते येथे वाशिष्ठी नदीकिनारी दिल्ली येथील संस्थेकडून मृदा परीक्षण आणि भूगर्भ चाचणी घेण्यात आली.

कोयना धरणाच्या वर पाण्यावर वीज तयार केल्यानंतर हे पाणी कोळकेवाडी धरणातून वाशिष्ठी नदीमार्गे समुद्राला जाते. हे पाणी सुमारे १६० कि.मी. अंतरावर असलेल्या मुंबईला जलवाहिन्यांद्वारे नेण्यावर नियोजन केले जात आहे. त्यासाठी ३८ कोटी रुपये खर्चून व्हॅसकॉम कंपनीमार्फत हवाई सर्वेक्षण करण्यात आले. या अवजलाच्या वापरबाबतचा व्यवहार्यता अहवाल तयार करण्याकरिता केंद्र शासन अंगीकृत नवी दिल्ली येथील वाप्कोस लिमिटेड व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. यासंदर्भात कोलाड पाटबंधारे विभाग कार्यालयाने कळंबस्ते ग्रामपंचायतीला पत्र पाठवत याबाबतची माहिती दिल्याचे सरपंच विकास गमरे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 17-05-2025