राजापूर : धूळफेक पेरणीला सुरुवात

राजापूर : हवामान खात्यासह निसर्गातील बदलामुळे मॉन्सूनच्या आगमनाचे संकेत मिळत आहेत. शेतकरीही खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदी सुरू असताना राजापूर पंचायत समितीच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठ, महाबीज आणि राष्ट्रीय बीज निगमची बियाणी खरेदीसाठी ७५ टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, तशी माहिती पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी परेश सुर्वे यांनी दिली.

मॉन्सूनपूर्व शेतीच्या मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे. मान्सूनपूर्व केल्या जात असलेल्या धूळफेक पेरण्यामध्ये करण्यामध्ये शेतकरी गुंतला आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील जैतापूर परिसरासह शहरानजीकच्या काही गावांमध्ये धूळफेक पेरण्यांची कामे सध्या वेगाने सुरू आहेत.

धूळफेक पेरण्यांसाठी लागणारी नांगरणीची कामे सुरू असल्याचे चित्र शेतामध्ये दिसत आहे. सध्या या धूळफेक पेरण्या अंतिम टप्यामध्ये असून येत्या काही दिवसांमध्ये त्या पूर्ण होणार आहेत.

धूळफेक पेरण्या अंतिम टप्प्यामध्ये असताना खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे आणि खते खरेदी करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिल्याचे चित्र दिसत आहे.

शेतक-यांकडून बी-बियाणे खेरदी केले जात असताना पंचायत समितीच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठ, महाबीज आणि राष्ट्रीय बीज निगमची बियाण्यांच्या खरेदीवर ७५ अनुदान उपलब्ध करून देण्यात आहेत.

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून हे अनुदान देण्यात येणार असून त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे नमुन्यामध्ये अर्ज करून त्यासोबत आधार कार्ड, बैंक पासबुक, भातशेती नोंद असलेला सातबारा उतारा आणि बियाणे खरेदीची पावती जोडावी लागणार आहे. याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

सात ठिकाणी घेणार आसूत्रीचे प्रात्यक्षिक

पारंपरिक पद्धतीने भातलावणी करीत असताना शेतकऱ्यांना मनुष्यबळासह अन्य विविध समस्यांना सामोरे जावे लागते. चारसूत्री पद्धतीने भातलावणी केल्यास मनुष्यबळही कमी लागते. त्याचवेळी भाताच्या उत्पादनाचाही टक्का वाढण्यास मदत होते. त्यामुळे चारसूत्री पद्धतीची प्रचार, प्रसार करताना त्याची जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती व्हावी, या उद्देशाने पंचायत समितीच्या कृषी विभागातर्फे तालुक्यामध्ये चारसूत्री भात लागवडीची प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये केळवली, धाऊलवल्ली, पन्हळेतर्फ सौंदळ, कोंडचेतर्फ सौंदळ, तेरवण, भू, हातिवले येथील शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 17/May/2025