रत्नागिरी : मे महिन्यात कोकणात आलेले चाकरमानी, स्थानिक बागायतदार, शेतकरी, मच्छीमार तरुण यांच्यासाठी चाकरमानी उद्योग परिषद दापोलीत २४ रोजी तर गुहागरमध्ये २५ रोजी आयोजित केली आहे. ही परिषद ग्लोबल कोकणच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष संजय यादवराव यांनी दिली.
चाकरमानी उद्योग परिषदेमध्ये संबंधित क्षेत्रातील यशस्वी उद्योजक आणि तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन व प्रेरणा देतील. कोकणात पर्यटनाची क्रांती करणारे, फेरीबोट सेवा सुरू करणारे व पहिली मोठ्या प्रमाणात मसाला शेती करणारे माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल, दापोली गवे पंचक्रोशीमध्ये नर्सरी उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक क्रांती करणारे शास्त्रज्ञ शेतकरी उद्योजक अरविंद अमृते, हळद लागवड तंत्रामध्ये सचिन कारेकर हे आधुनिक शेतीच्या माध्यमातून कोकणात क्रांती कशी करता येईल यावर मार्गदर्शन करतील.
गेली पन्नास वर्षे बांबू लागवड ५० एकर क्षेत्रामध्ये करणारे व एकरी एक लाख रुपये उत्पन्न बांबू लागवडीतून घेता येतं हे प्रत्यक्ष सिद्ध करणारे शेतकरी मायकल डिसोजा, दलालांना आंबे न देता वीस हजार पेट्या म्हणजे एक लाख डझन आंबा स्वतः थेट ग्राहकांना विकणारा शेतकरी उद्योजक आबिद काजी हे कृषी विषयावर बोलणार आहेत. कोळंबी शेतीत गेली २५ वर्षे करणारे ग्लोबल कोकणचे शिलेदार काशिनाथ तारी आणि या विषयातील तज्ञ डॉ. राजू भाटकर, मच्छीमार उद्योजक नंदू चौगुले हे मत्स्य उद्योग या विषयांमध्ये मार्गदर्शन करतील, असे यादवराव यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 19/May/2025













