Ratnagiri Krushi Yojana : कृषी योजनांमधून जिल्ह्यात सव्वातीनशे कोटींचा निधी

रत्नागिरी : जिल्ह्यात ५४ हजार हेक्टरइतके क्षेत्र खरीप व रब्बी पिकाखाली असून, १ लाख ८८ हजार इतके क्षेत्र फळपिकाखाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी, आत्मा विभागाकडून विविध लाभाच्या योजना राबवल्या जातात. त्याचा लाभ शेतकऱ्यांना दिला जात असून, त्या योजनेतून गेल्या दोन वर्षात सव्वातीनशे कोटींचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे तसेच किसान सन्मान निधी योजनेतील २०व्या हप्त्यापोटी १ लाख ६१ हजार ३९४ शेतकऱ्यांना ३४ कोटी ७८ लाख वितरित केले, असे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी सांगितले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत २०२५-२६ मध्ये आजपर्यंत ११३२.३० हेक्टर इतक्या क्षेत्रावर फळबाग लागवड पूर्ण झाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी महासन्मान योजना, हवामान आधारित फळपिक विमा योजना, खरीप पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आदी योजनांचा लाभशेतकऱ्यांना देण्यात आला असून, त्याचा निधीही वितरित करण्यात आला आहे.

नैसर्गिक आपत्तीअंतर्गत २०२४-२५ वर्षात ५८२.२७ हेक्टर क्षेत्रासाठी ४ हजार ४८८ शेतकऱ्यांना ११९.०४ लाख नुकसान भरपाई देण्यात आली. यावर्षी फलोत्पादन अभियान कार्यक्रमात महाडीबीटीद्वारे २४ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खाती जमा केले गेले. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन योजनेत ११० सेंद्रिय उत्पादक गटांची स्थापना करून ११ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापित होणार आहेत, तसेच नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत ५२ गटांची स्थापना करण्यात आली. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत ५ शेतकरी उत्पादक कंपनी व संस्थांना २ कोटी ६२ लाखांचे वाटप झाले असून, सिंधुरत्नमधून १ कोटी १८ लाख ७५ हजार रुपये मिळाले आहेत. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत १४ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना बियाणे वाटप
जिल्हा नियोजनमधून नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना भात व नाचणी बियाणे वितरण प्रात्यक्षिकांतर्गत ४४ लाख १९ हजार रकमेची ६६ हजार ६६ किलो भातबियाणे वितरित केली गेली. त्याचा लाभ ३५०० शेतकऱ्यांनी घेतला. ४ हजार ३५२ किलो नाचणी बियाणे २ हजार शेतकऱ्यांना दिले. आदिवासी शेतकरी बांधवांना ५०० किलो तूरबियाणे ५०० शेतकऱ्यांना देण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 04/Sep/2025