रत्नागिरी: रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या (Ratnagiri Municipal Election) उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी (दि. १७ नोव्हेंबर) एक सर्वात मोठी राजकीय बातमी (Breaking News) समोर आली आहे. महायुतीमधील (Mahayuti) जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी एक मोठा ‘ट्विस्ट’ झाला असून, भारतीय जनता पक्षाचे (BJP) तीन प्रमुख इच्छुक उमेदवार आता थेट शिवसेनेकडून (Shiv Sena) नगरसेवक पदाची निवडणूक लढवणार असल्याची खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. या अनपेक्षित घडामोडीमुळे रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
कोणाला, कुठून उमेदवारी?
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खालील तीन भाजप इच्छुकांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे:
- श्री. राजू कीर (प्रभाग क्र. ६)
- सौ. मेधा कुलकर्णी (प्रभाग क्र. ६)
- श्री. सुशांत उर्फ मुन्ना चवंडे (प्रभाग क्र. १५)
हे तिन्ही उमेदवार आपापल्या प्रभागात भाजपचे प्रबळ दावेदार मानले जात होते.
रात्री उशिरापर्यंत ‘खलबते’, आता ‘एबी’ फॉर्म मिळणार
महायुतीमध्ये जागावाटपावरून आणि इच्छुकांच्या नाराजीवरून पेच निर्माण झाला होता. हा तिढा सोडवण्यासाठी आणि बंडखोरी टाळण्यासाठी काल (रविवार) रात्री उशिरापर्यंत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू होते.
अखेर, या तिन्ही जागांवर भाजपच्या इच्छुकांना शिवसेनेच्या चिन्हावर लढवण्याची ‘तडजोड’ करण्यात आल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, या तिन्ही उमेदवारांच्या नावांवर रात्री उशिरा अंतिम निर्णय झाला. आता काही वेळातच (आज, दि. १७) या तिन्ही उमेदवारांना शिवसेना पक्षाकडून अधिकृत ‘एबी फॉर्म’ (AB Form) दिले जाणार आहेत. एबी फॉर्म मिळाल्यानंतर, अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ते आपापले उमेदवारी अर्ज दाखल करतील. महायुतीने बंडखोरी टाळण्यासाठी आणि सर्व इच्छुकांना सामावून घेण्यासाठी ऐनवेळी केलेला हा ‘पॅटर्न’ रत्नागिरीच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.














