Swacch Bharat Mission : जिल्ह्यात ‘हमारा शौचालय, हमारा भविष्य’ मोहीम

रत्नागिरी : केंद्र व राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) विभागामार्फत हमारा शौचालय, हमारा भविष्य ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम मानवी हक्क दिनापर्यंत १० डिसेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले.

स्वच्छ भारत मिशनविषयी रानडे यांनी माहिती दिली. शौचालये ही केवळ सोयीची नव्हे, तर आरोग्य, प्रतिष्ठा व सुरक्षिततेची हमी देणारी मूलभूत गरज आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांतील वैयक्तिक शौचालये व सामुदायिक शौचालयांची तपासणी, दुरुस्ती, देखभाल व सुशोभीकरणावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. अपूर्ण किंवा दुरुस्तीची गरज असलेली सार्वजनिक शौचालये यांची नोंद घेऊन त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

उत्कृष्ट शौचालय पुरस्कार
२१ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत गावागावांत मोहिमेचे विविध उपक्रम राबवण्यात येतील. उत्तम देखभाल व सुशोभीकरण करणाऱ्या वैयक्तिक व सामुदायिक शौचालये यांना अंतिम टप्प्यात विशेष गौरव करण्यात येणार आहे. १० डिसेंबर रोजी मोहिमेचा समारोप करून उत्कृष्ट शौचालय पुरस्कार जाहीर केले जाणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:31 PM 24/Nov/2025