राजापूर : भाजीचे दर गगनाला !

राजापूर : शहरातील गणेशघाट परिसरात दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात खरेदीसाठी गर्दी होत आहे; मात्र, भाजीपाल्यासह फळांचे दर गगनाला भिडले आहेत. महागाईच्या भडक्याचा चटका सर्वसामान्यांना बसणार आहे. सध्या बाजारपेठेतील वस्तूंचा दर्जा आणि बेशिस्तपणामुळे स्थानिकांमधून आधीच बोंबाबोंब सुरू असतानाच दर वधारल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. गेली कित्येक वर्षे राजापूर शहरामध्ये दर गुरुवारी आठवडा बाजार भरतो.

या बाजारात स्थानिकांसोबत परजिल्ह्यातील मोठ्या संख्येने व्यापारी, शेतकरी आपला माल विक्रीसाठी घेवून येतात. या बाजारामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होते. नियमित बाजाराच्या तुलनेमध्ये आठवडा बाजारातील वस्तूंचे दर कमी असण्याची सर्वसामान्यांची अपेक्षा असते; मात्र, राजापुरातील आठवडा बाजारातील गगनाला भिडलेल्या दरांमुळे सर्वसामान्यांचे अंदाज आणि अपेक्षा फोल ठरली आहे. नारळासह टोमॅटोच्या दराने पन्नाशी गाठली आहे. कोंथिबीर व मेथी जुडी, भोपळी मिरची, गवार, फरसबी, घेवडी, कारली आदींसह विविध प्रकारच्या भाज्यांच्या दरांमध्ये दुप्पट वाढ होत या दरांनी शंभरी गाठली आहे.

कोबी, फ्लॉवर नग ३० ते ५० रुपये, मिरची, आले १०० ते १२० रुपये प्रतिकिलो दरानी तर सफरचंद १४० रु. किलो, चिकू १०० रुपये, केळी ५० रुपये डझन अशा दरांनी विक्री होत आहे. दुसऱ्या बाजूला कांदे, बटाटे, लसूण, मिरची यांचे दरही चांगलेच वाढले आहेत. बोंबिल, कोलिम, सुके चिंगळे यांची ४०० ते ८०० रुपये दरांनी विक्री होत होती.

आठवडा बाजारातील वस्तूंचा दर्जा आणि बेशिस्तपणे भरणाऱ्या बाजाराबाबत आधीच बोंबाबोंब आहे. भेसळयुक्त आणि कमी दर्जाच्या वस्तूंच्या विक्रीबाबत ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असताना दुसऱ्या बाजूला वस्तूंच्या वाढलेल्या दरांनीही सर्वसामान्यांचे कंबरडे मोडून गेले आहे.

आठवडा बाजारामध्ये नेहमी खरेदीला येतो; मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये भाज्यांसह अन्य वस्तूंचे दर चांगलेच वाढल्याचा अनुभव आहे. कधी कधी नियमित बाजारापेक्षा आठवडा बाजारातील वस्तूंचे दर जास्त असतात. भेसळयुक्त वस्तूंचीही काहीवेळा विक्री होते. त्यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे- राजश्री पवार, गृहिणी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:59 PM 25/Nov/2025