राजापूर पोस्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण सुविधा पूर्ववत
राजापूर : बीएसएनएलच्या तांत्रिक बिघाडामुळे राजापूर पोस्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण सेवा कोलमडली होती. मात्र, आता तांत्रिक बिघाड दूर झाल्याने सुमारे तीन आठवड्यांनंतर रेल्वे आरक्षण सेवा पुन्हा एकदा कार्यान्वित झाली आहे.
स्थानिक लोकांसह लोकप्रतिनिधींकडून सातत्याने केलेल्या प्रयत्नांनंतर कोकण रेल्वे प्रशासनाने राजापूर पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सेवा कार्यान्वित केली आहे. मुंबईसह देशभरात कुठेही प्रवाशांना रेल्वेचे आरक्षण राजापूर पोस्ट कार्यालयातून मिळत आहे. राजापूर पोस्ट कार्यालयात एक स्वतंत्र खिडकी उघडून तेथून रेल्वे प्रवाशांना तिकिटे सहज उपलब्ध होत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये तालुक्यातील रेल्वे प्रवाशांनी आरक्षण सेवेचा चांगला लाभ घेतला आहे. यामध्ये दैनंदिन मुंबईकडे जाणार्या व परत येणार्या प्रवाशांचा सर्वाधिक समावेश आहे.
मात्र गेल्या तीन आठवड्यांहून अधिक काळ बीएसएनएल सेवेमध्ये निर्माण झालेला तांत्रिक बिघाडामुळे राजापूर पोस्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण सेवा ठप्प झाली होती. त्याचा फटका प्रवाशांना बसत होता. रेल्वे आरक्षण सेवा केंद्र बंद असल्याने आरक्षणासाठी आलेल्या प्रवाशांना रिकामी हाताने माघारी परतावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान, बीएसएनएल सेवेमध्ये आलेला तांत्रिक बिघाड आता दूर झाला आहे. त्यामुळे कोलमडलेली रेल्वे आरक्षण सेवा आता पूर्ववतपणे कार्यान्वित झाल्याची माहिती राजापूर पोष्ट प्रशासनाकडून देण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 04-07-2024
What's Your Reaction?