कशेडी बोगद्याच्या दर्जाबाबत पंतप्रधानांकडे तक्रार : विनायक राऊत

Jul 17, 2024 - 11:41
Jul 17, 2024 - 11:52
 0
कशेडी बोगद्याच्या दर्जाबाबत पंतप्रधानांकडे तक्रार : विनायक राऊत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी जे ठेकेदार आणले त्यांच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप होत आहे. कारण, वर्षातच महामार्ग उखडू लागला आहे. कशेडी बोगद्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून पहिल्या पावसातच या बोगद्याला गळती लागली आहे. भविष्यात या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्यामुळे कशेडी बोगद्याच्या कामाची चौकशी करावी, अशी तक्रार माजी खासदार आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. रत्नागिरी दौऱ्यावर असताना माजी खासदार राऊत यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. 

राऊत म्हणाले, "मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. मी खासदार होतो तेव्हा केंद्र आणि राज्य शासनाकडे याचा वारंवार पाठपुरावा करून काम करून घेतले; परंतु जे ठेकेदार आणले गेले त्यांनी कामाचा दर्जा न ठेवल्याने वर्षात महामार्ग ठिकठिकाणी उखडला आहे. महामार्गातील कशेडी बोगद्याला ९ किमीचा बायबाक असून हा बोगदा २ किमीचा आहे परंतु या बोगद्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने बोगदा धोकादायक बनला आहे. याकडे मी सातत्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले; परंतु त्याकडे दुर्लक्ष केले. कशेडी घाटाचे काम शिंदे डेव्हलपर्सला दिले आहे. ते राज्यकर्त्यांच्या जवळचे आहेत.

पहिल्या पावसात पाणी झिरपून गळती लागली आहे. त्यामुळे वाहतुकीला धोकादायक बनला आहे. याकडे मी सर्वांचे लक्ष वेधले आहे. तशी तक्रारदेखील केली आहे. ३ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे." यामध्ये म्हटले आहे की, कशेडी बोगद्याची पाहणी वेळीच केली नाही, तर भविष्यात खूप मोठा अपघात होऊ शकतो. आता छोट्या वाहनांसाठी हा बोगदा खुला आहे; परंतु बोगद्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे.

केंद्रीय मंत्र्यामुळे कंपनीला झुकते माप 
एका केंद्रीय मंत्र्यामुळे शिंदे डेव्हलपर्स कंपनीला झुकते माप दिले जात आहे. मुंबई-गोवा महामार्ग न होण्यामागे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता कारणीभूत आहेत. त्यांच्यावर कारवाईची गरज आहे. कशेडी घाटात किंवा बोगद्यात दुर्घटना झाली, तर ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकामाचे मुख्य अभियंत्यांना जबाबदार धरले जावे, तसे तक्रारीत म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 17/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow