पन्नाशीच्या आतील वयोगटाच्या लोकांमध्ये कॅन्सर वाढतोय : डॉ. अमोल पवार
चिपळूण : पन्नाशीच्या आतील वयोगटाच्या लोकांमध्ये झपाट्याने कॅन्सर वाढत असून लोकांनी सदृढ आरोग्य शैलीसाठी नियमित तपासणी निर्णायक ठरेल, अशी माहिती चिपळूणच्या ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरचे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अमोल पवार यांनी दिली.
यावेळी ते म्हणाले की, कर्करोगाचे वाढते प्रमाण हे देशासमोरील एक मोठे आव्हान ठरत आहे. ३० ते ५० वयोगटातील कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. डब्ल्यूएचओच्या मते गेल्या १० वर्षांत भारतात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात कर्करोगाने ग्रस्त असलेल्या १० पैकी ६ लोकांचा मृत्यू होतो. ५० वर्षाखालील ३० टक्के व्यक्तींमध्ये कर्करोगाचे निदान होत आहे.
तरुणांमधील कर्करोगाच्या कारणांपैकी सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे बदलती जीवनशैली आहे. तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन, आहारात जंक फुडचा समावेश, तणाव, पर्यावरणीय घटक तसेच जीवनशैलीत बिघाड झाल्याने कॅन्सरची प्रकरणे वाढत आहे. कॅन्सरग्रस्तांसाठी चिंतेची बाब म्हणजे त्याचे वेळीच निदान होत नाही, ज्यामुळे कॅन्सर पसरण्याचा धोका जास्त असू शकतो.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, कर्करोगाच्या मृत्यूंपैकी सुमारे ३३ टक्के मृत्यू तंबाखू, अल्कोहोल, उच्च बॉडी मास इंडेक्स, कमी फळे आणि भाज्यांचे सेवन आणि पुरेशी शारीरिक क्रिया न करणे या कारणांमुळे होऊ शकतात. सुरुवातीच्या टप्प्यात कॅन्सरचं निदान झाल्यास योग्य उपचारांनी कॅन्सर नियंत्रणात आणता येतो आणि रुग्णाच्या जीविताचा धोका कमी होतो.
कॅन्सरच्या उपचार प्रणालीत कमालीचे बदल झाले असून आता शरीरातील ज्या भागात कर्करोगाचा संसर्ग झाला आहे त्याच भागात अचूक उपचार केले जातात. रेडीएशन, केमो, टार्गेटेड, इम्युनोथेरपीसारख्या अद्ययावत उपचारांमुळे आज अनेक रूग्णांनी कर्करोगावर मात केली आहे. या आजाराबाबत योग्य तज्ज्ञांची भेट घेऊन आवश्यक उपचार घेण्याचे मत डॉ. पवार यांनी व्यक्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 PM 19/Jul/2024
What's Your Reaction?