परतीच्या प्रवासात चाकरमान्यांना मोठा आर्थिक भुर्दंड
गुहागर : गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी मोठा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. काही चाकरमान्यांनी प्रवासासाठी खासगी बसची तिकिटे घेतल्यामुळे सध्या त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा तिकिटे आकारली जात आहेत. या प्रकारामुळे गुहागर ते मुंबई प्रवास करणारे हतबल झाले आहेत. गुहागरहून जाणारे अनेक जणं जादा पैसे देऊन नाईलाजाने खासगी बसचा उपयोग करित आहेत. त्यामुळे ट्रॅव्हल्सवाल्यांची दिवाळीच सुरु आहे.
गणेशोत्सवाला चाकरमानी मोठ्या संख्येने आले आहेत. रेल्वेने येणे गुहागर तालुक्यातील प्रवाशांना सुलभ होत नाही. मुंबई-पुण्यातून घही सणासाठी येताना प्रत्येकाजवळ बऱ्यापैकी सामान असते. ते गुहागरला येताना अनेक वाहने बदलत येतात त्यामुळे गुहागर तालुक्यातील प्रवासी गावात थेट येण्याचा मार्ग स्विकार करतात. सध्या तालुक्यातील बहुसंख्य गावातून अशा खासगी बस सोडल्या जात आहेत. सायंकाळी घरात जेवण करून निघालेला प्रवासी पहाटे मुंबईत थेट विरारला पोचतो. सकाळी उठून चाकरमान्याला कामधंदा वा नोकरी गाठणे शक्य होते. गुहागर तालुक्यातील खेडेगावातील अनेकांची एसटीपेक्षा खासगी बसला पसंती असते.. त्याचाच फायदा खासगी बसवाल्यांकडून घेतला जात आहे.
गणेशोत्सवात गावी आलेल्या चाकरमान्यांना परत जाण्यासाठी ८०० रुपये तर काहींची मजल तेराशे तर दिड हजारापर्यंत गेली आहे. वेगवेगळ्या खासगी बसच्या मालकांकडून सुमारे १५ ते २० गाड्या दररोज गुहागरच्या विविध भागातून सुटत आहेत. शृंगारतळीची बाजारपेठ या गाड्याचे मोठे स्टँडच झाले आहे. या उलट महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या गुहागर- ठाणे, पुणे व मुंबई उपनगरात जाण्यासाठी बस आहेत.
खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या आस्थापना बुकिंगवेळी तिकीट दर वेगळे सांगतात आणि प्रत्यक्ष प्रवासाच्या दिवशी दुप्पट किंवा तिप्पट रक्कम घेतात. तिकिट देण्यासाठी थोडावेळ मागितला तरीही त्यांच्याकडून सहकार्य मिळत नाही. जादा दराची पावतीही दिली जात नाही. पैसे न दिल्यास गाडीतून खाली उतरण्यासही सांगितले जाते. - पवन जाधव, चिखली, गुहागर
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 9/13/2024
What's Your Reaction?