Rain Update : समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राला चक्रिय वाऱ्याची जोड..
रत्नागिरी : आठवडाभर झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर गेले दोन दिवस ओसरलेल्या स्थितीत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी बहुतांश भागात सरीचा राबता सुरू होता. मात्र, त्यामध्ये जोर नव्हता. मध्येच उसंत घेत पावसाने हलक्या आषाढ सरींचे सातत्य होते. दरम्यान, चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय असल्याने पुढील दोन दिवस रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पवसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टी, पश्चिम घाटाचा परिसर आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी संततधार कायम असून, पुढील तीन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी सागरात आणि बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाबाच्या क्षेत्राला चक्रिय वाऱ्याची जोड मिळल्याने या भागात पावसाचे सातत्य राहणारा हे मात्र त्याचा जोर कमी राहणार असल्याचा हवमान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस पावसाचा भर किनारपट्टी भागात मध्यम ते हलक्या स्वरुपात राहणार आहे. पावसाचा जोर ओसरल्याने जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधील जलस्तरही जगबुडी नदीचा अपवाद वगळता बहुतांश नद्यातील जलस्तर पूररेषेखाली विसावला. मात्र, जगबुडी नदी दुपारी १२ वाजण्याच्या आपत्ती नियंत्रण विभागाच्या नोंदीनुसार इशारा पातळीच्या १.७५ मिटर उंचीवरुन वाहत होती. मात्र, येथील पूरस्थिती नियंत्रणात असल्याचे आपत्ती नियंत्रण विभागाने वर्तविली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रायगड, सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता असून, या ठिकाणी रेड अलर्ट' देण्यात आला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर यांसह कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर नंदूरबार, धुळे, जळगाव, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर तर कोल्हापूर व नाशिकच्या घाट भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर सातारच्या घाट विभागात जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे या सर्व जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांना जोरदार ते खूप जोरदार पाऊस तर धुळे नंदूरबार नाशिक या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यास पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवारी उत्तर महाराष्ट्र तर आज २५ जुलै रोजी पालघर ठाणे २६ व २७ जुलै रोजी पुणे व सातारच्या घाट विभागात जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने जारी केले आहे.
दरम्यान, बुधवारी संपलेल्या २४ तासात म्हणजे सकाळी साडे आठ वाजता रत्नागिरी जिल्ह्यात ५२. ११ मि.मीच्या सरासरीने ४६९ मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली. यामध्ये चिपळूण, रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यात ७५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला तर ४० मि. मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद खेड, गुहागर, लांजा आणि राजापूर तालुक्यात झाली. मंडणगड आणि दापोली तालुक्यात अनुक्रमे ३२.८९ आणि ३१. २० मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत २२२३ मि.मी.च्या सरासरीने एकूण २० हजारी मजल गाठली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत पावसाचा प्रवास ६६ टक्के झाला आहे. गतवर्षी या दिवशी पावसाने जिल्ह्यात ५० टक्के मजल मारली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:06 PM 25/Jul/2024
What's Your Reaction?