महाराष्ट्रातील २० नदीजोड प्रकल्पांचा अहवाल तयार : जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील
नवी दिल्ली : देशातील ३० आंतरराज्य नदीजोड प्रकल्पांच्या अंमलबजावणीची तयारी सुरू झालेली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील २० प्रकल्पांचा समावेश आहे. त्यांचा अहवालही तयार असल्याची माहिती जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी गुरुवारी लोकसभेत दिली.
देशातील ३० आंतरराज्य प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील २ प्रकल्पांचा, तर २० राज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पांचा समावेश आहे. यापैकी काही प्रकल्प रद्द करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे आणि भास्कर भगरे यांनी महाराष्ट्रासह देशातील नदीजोड प्रकल्पांविषयी लेखी प्रश्न विचारला होता. त्यावर मंत्री पाटील यांनी उत्तरात सांगितले की, दमनगंगा पिंजळ नदीजोड प्रकल्पाचा अहवाल तयार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईला पाणीपुरवठा सुरळीत होईल. पार-तापी नर्मदा नदीजोड प्रकल्पाचा अहवालही तयार आहे. हे दोन्ही प्रकल्प महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यातील आहेत.
महाराष्ट्रातील राज्यांतर्गत वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा अहवाल तयार आहे. याखेरीज कृष्णा-भीमा, दमनगंगा-गोदावरी, वैतरणा गोदावरी, दमनगंगा-वैतरणा-गोदावरी, कोयना- मुंबई सिटी, गोदावरी-पूर्णा-मांजरा, कोयना-नीरा, मुळशी-भीमा, सावित्री- भीमा, कृष्णा-भीमा, जळगाव जिल्ह्यातील तापी नदीजोड, नर्मदा- तापी या प्रकल्पांचा पीएफआर तयार झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.
'
या' नदीजोड प्रकल्पांना नकार
वैनगंगा-मांजरा, पातळगंगा- गोदावरी, सावित्री-कुंडलिका-भीमा, नार-पार-गिरना, तापी-गोदावरी हे नदीजोड प्रकल्प व्यावहारिक नसल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले. तसेच वैनगंगा-गोदावरी नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने रद्द केल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:09 PM 02/Aug/2024
What's Your Reaction?