बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचारावर पंतप्रधान मोदी, अमित शाह गप्प का? : आदित्य ठाकरे
मुंबई : वक्फ बोर्डाचे विधेयक मंजूर झालेले नाही. तर ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले आहे. इंडिया आघाडीने तशी मागणी केली होती. केवळ लूट करण्यासाठी भाजपा सर्वधर्म समभाव मानतो.
मीडियाशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. तसेच दिल्ली भेटीबाबत माहिती दिली. अयोध्या मंदिराच्या परिसरातील जागेबाबतही वाद आहेत. लोढा तिथे जाऊन आश्रम बांधणार आहेत का की कमर्शिअल प्रॉपर्टी करणार आहे, हे आम्हाला माहिती आहे, असा खोचक टोला लगावत, आरोप-प्रत्यारोप होत राहतील. परंतु, वक्फ बोर्डाचे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे जावे, हीच आमची मागणी होती. कोणावर अन्याय होऊ नये, हीच आमची भूमिका आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
भाजपापेक्षा जास्त सन्मान, आदर आणि प्रेम मिळाले
दिल्लीत सोनिया गांधी, सुनिता केजरीवाल यांच्यासह अनेकांशी गाठी-भेटी झाल्या. या सर्व गाठी-भेटी राजकीय नव्हत्या. अशा गाठी-भेटी होत असतात. या दिल्ली भेटीत आम्हाला भाजपापेक्षा जास्त सन्मान, आदर आणि प्रेम मिळाले. जागावाटप असेल किंवा अन्य मुद्दे असतील, त्यासंदर्भात महाराष्ट्रातच चर्चा होणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच केदारनाथ धाम, अयोध्या धाम याबाबत जे सांगितले जात आहे तसेच बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत आहे, त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलले पाहिजे. निवेदन दिले पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा दिल्लीतील तीन दिवसीय दौरा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि कुटुंबातील इतर सदस्य, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत चहापानानंतर पूर्ण झाला. उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे आणि पक्षाचे इतर नेत्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. आदल्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचीही भेट घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:23 09-08-2024
What's Your Reaction?