मुलाच्या मृत्यूच्या विरहाने वडिलांनीही सोडला प्राण
रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीच्या अनुषंगाने वसई-विरार येथे नोकरीनिमित्त असलेले, मूळचे सांगली येथील रहिवासी फासे कुटुंबीय २ रत्नागिरीत फिरण्यासाठी आलेले होते. फासे कुटुंबावर शनिवारी दुपारी मोठे संकट कोसळले. आरे-वारे किनारी समुद्राच्या पाण्यात बुडून सिद्धार्थ विनायक फासे (19) या तरुणाचा मृत्यू झाला होता. आपल्या मुलाचा डोळ्यादेखत झालेला मृत्यूचा जबर धक्का वडील विनायक फासे यांना बसला होता. सांगली विटा येथे गावी जाताच त्यांची प्रकृती खालावली. मुलाचे अंत्यसंस्कार पार पडताच दुःख असह्य बनल्याने विनायक फासे यांनीही रविवारी दुपारी प्राण सोडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
फासे कुटुंबियांवर कोसळलेल्या या दुहेरी दुःखाच्या डोंगराने त्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवारही शोकसागरात बुडाले. रत्नागिरीच्या कोषागार कार्यालयात काही वर्षांपुर्वी कार्यरत असलेले व सध्या वसई विरार महानगरपालिकेचे मुख्य लेखा परिक्षक विनायक सुरेश फासे (46) हे 15 ऑगस्ट रोजी आपल्या कुटुंबासह फिरण्यासाठी रत्नागिरीत आले होते. शनिवारी दुपारी आपल्या कुटुंबासमवेत नजिकच्या आरे वारे येथील किनाऱ्यावरती कुटुंब फिरत असतानाच त्यांचा मुलगा सिद्धार्थ हा गुडघाभर पाण्यात उतरला होता. त्यावेळी मोठ्या लाटेने सिध्दार्थचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. तर त्या सहकारी असलेले प्रविंद्र बिरादार यांना वाचिवण्यात यश आले होते.
या घटनेनंतर विनायक फासे कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. आपल्या मुला मृतदेह पंचनामा करून पोलिसांनी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून त्यांच्या ताब्यात देण्यात आला. दुःखसागरात बुडालेले फासे कुटुंबिय आपल्या सांगली जिल्ह्यातील विटा गावी रविवारी पहाटे गेले. त्यानंतर रविवारी दुपारी बुडून मृत्यूमुखी पडलेल्या सिध्दार्थवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. पण मुलाच्या मृत्यूचे दुःख विनायक फासे यांना असह्य झाले होते. त्यातच त्यांची प्रकृती खालावली व जबर धक्क्याने त्यांनीही प्राण सोडला. हे वृत्त त्यांच्या मित्र परिवाराला समजताच धक्का बसला. कारण विनायक फासे हे रत्नागिरीतही कोषागार कार्यालयात मागील काळात सेवेत होते. त्यानंतर त्यांची बदली झाली होती. त्यामुळे विनायक फासे यांचा रत्नागिरीत मोठा मित्र परिवार आहे. त्यांच्या प्रसंगाचे वृत्त समजताच जिल्हा कोषागार कार्यालयासह नगर परिषद, जिल्हा परिषद मधील अधिकाऱ्यानीही हळहळ व्यक्त केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 20-08-2024
What's Your Reaction?