आदित्य ठाकरे दिशा सालियन प्रकरणाबाबत उत्तर देऊन आम्हाला गप्प का करत नाहीत? : नितेश राणे
मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन विरोधकांनी महायुती सरकारची कोंडी केली असताना आता भाजपने दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. आदित्य ठाकरे हे सध्या छत्रपती संभाजीनगर येथे आहेत.
दिशा सालियन हिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. यामध्ये आदित्य ठाकरे यांचाही सहभाग आहे. दिशा सालियन अत्याचार प्रकरणात लहान मुलांचा रोल काय होता, हा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारावा. उद्धव ठाकरे , आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे नेते महिला अत्याचाराबाबत बोलतात. मग आदित्य ठाकरे यांना भाजपचे कार्यकर्ते दिशा सालियन प्रकरणावरुन त्यांना प्रश्न विचारत असतील तर त्यामध्ये गैर काय आहे? पण तिकडे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी पाहायला मिळाली. आदित्य ठाकरे हॉटेलमध्ये लपून बसलाय. त्याची बाहेर येण्याची का हिंमत झाली नाही? आदित्य ठाकरे हे दिशा सालियन प्रकरणाबाबत उत्तर देऊन आम्हाला गप्प का करत नाहीत, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.
मात्र, अंबादास दानवे यांनी यावर भाजपवरच आगपाखड केली. दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. मग भाजपने याबाबत गृहमंत्र्यांनाच याबाबत प्रश्न विचारावेत, असे अंबादास दानवे यांनी म्हटले.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
दिशा सालियन प्रकरणाबाबत भाजपने केलेल्या आरोपांबाबत आदित्य ठाकरेंनी मोजक्या शब्दांत प्रत्युत्तर दिले.भाजपचे नेते ज्यांना घाबरतात, त्यांची बदनामी करण्याचे काम ते करतात, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. महाराष्ट्रात एका पोलीसावर कोयता गँगने हल्ला केला. आमच्या काळात असे कधी घडले नाही. पण आता पोलिसांवर हल्ले वाढले आहेत, महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. बदलापूर घटनेतील वामन म्हात्रेंना भाजपने पक्षातून का काढलेले नाही. रस्त्यावर आंदोलन करणाऱ्यांवर तुम्ही गुन्हे दाखल केले. पण बलात्कार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करायला पोलिसांना 10 दिवस लागले, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 26-08-2024
What's Your Reaction?