रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सव उत्साहात सुरू
◼️ दीड दिवसाच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप
◼️ जिल्ह्यात १३ हजारांवर घरगुती तर ९ सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन
रत्नागिरी : कोकणातील महत्त्वाचा सण असलेल्या गणेशोत्सवाला रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.
सर्वत्र गणेशोत्सवाची धूम असून जिल्हा भक्तिमय झाला आहे. पावसाची रिपरिप जरी असली तरी गणेशभक्तांचा आनंद गगनाला भिडला आहे. गणेशोत्सव म्हणजे उत्साहाला उधाण असते. घरोघरी भक्तिपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा होतो.
शनिवारी घरोघरी भक्तिभावाने गणरायाचे पूजन करण्यात आले. भाविकांनी घरगुती गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना विधी पूजा करून केली. आरती व मृदंग टाळ गजर, विविध वासाच्या अगरबत्त्या, सुगंधित साहित्य यामुळे सर्व परिसर आनंदित झाला आहे. मुंबई, पुणे, गुजरात आदी परजिल्हा व परराज्यातून आलेल्या गणेशभक्तांमुळे अवघा परिसर गजबजून गेला आहे.
शनिवार, दि. ७ सप्टेंबर रोजी घरोघरी गणरायाचे आगमन झाले. दरम्यान, परंपरेनुसार दीड दिवसांच्या बाप्पांचे रविवार, ८ सप्टेंबर रोजी विसर्जन करण्यात आले. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' चा गजर करत रत्नागिरी जिल्ह्यात रविवार, ८ सप्टेंबर रोजी दीड दिवसाच्या १३ हजार १५४ घरगुती तर ९ सार्वजनिक गणरायांना भाविकांनी भक्तिभावात निरोप दिला. रत्नागिरीतील भाट्ये व मांडवी समुद्रकिनाऱ्यासह ग्रामीण भागातील नद्यांवर बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. फुलांची उधळण, फटाके फोडत व ढोल- ताशांच्या गजरात जिल्ह्यात दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
रत्नागिरीतील मांडवी व भाट्ये समुद्र किनाऱ्यांसह तालुक्यातील ग्रामीण भागामध्येही पोलिस यंत्रणेने विशेष दक्षता घेत चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिस पाटलांकडून याबाबत विसर्जन मिरवणुकांची माहिती घेतली जात होती.
रविवारी दुपारी तीन वाजल्यानंतर गणेशभक्तांनी विसर्जनासाठी मांडवी समुद्रकिनारी हजेरी लावली. गर्दी टाळण्यासाठी मांडवी किनाऱ्यासह भाट्ये किनारीदेखील कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विसर्जनावेळी मांडवी येथील गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी वाहतुकीचेही नियोजन केले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 09-09-2024
What's Your Reaction?