Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे निर्माण झालेला गारवा आता पूर्णपणे गायब झाला असून, महाराष्ट्रात पुन्हा उष्णतेची तीव्र लाट जाणवू लागली आहे.
(Maharashtra Weather Update)
विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक शहरांचे तापमान ४३ ते ४५ अंशांच्या घरात पोहोचल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.(Maharashtra Weather Update)
सोमवारी विदर्भातील अकोला शहर राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. येथे कमाल तापमान तब्बल ४५.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. (Maharashtra Weather Update)
रविवारी सर्वाधिक तापमान असलेले जळगाव सोमवारी ४४.३ अंशांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. अमरावतीतही पारा ४४ अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागला.(Maharashtra Weather Update)
बुलढाण्यात उष्णतेची लाट
बुलढाणा शहराचे तापमान ४३.२ अंशांवर पोहोचले असून, ते सरासरीपेक्षा ४.१ अंशांनी अधिक असल्याने येथे अधिकृतपणे उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दिवसभर कडक उन्हामुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. दुपारच्या वेळेत नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळल्याचे चित्र होते.
नागपूर, वर्ध्यातही उन्हाचे चटके
विदर्भाची उपराजधानी नागपूरमध्ये सोमवारी ४२ अंश तापमानाची नोंद झाली. तापमान सरासरीपेक्षा कमी असले तरी वातावरणातील आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवत होता. त्यामुळे नागपूरकर अक्षरशः घामाघूम झाले. वर्ध्यात तापमान ४३.८ अंशांवर पोहोचले असून, भंडाऱ्यातही तापमानात मोठी उसळी नोंदवली गेली.
मराठवाडाही होरपळला
मराठवाड्यातील बीडमध्ये ४३.५ अंश, तर छत्रपती संभाजीनगर येथे ४३.४ अंश तापमानाची नोंद झाली. परभणी आणि मालेगावमध्येही ४३.२ अंश तापमानामुळे नागरिकांना उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.
१५ मेपर्यंत आणखी तापमान वाढणार
हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यासाठी धोक्याचा इशारा दिला आहे. विदर्भासह मध्य भारतात १५ मेपर्यंत तापमानात आणखी २ ते ४ अंशांची वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विशेषतः अकोला, अमरावती, बुलढाणा आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
तज्ज्ञांच्या मते, सध्या वातावरण कोरडे असून, सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढल्याने जमिनीचे तापमान झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत उष्माघाताचा धोका वाढू शकतो.
तापलेली शहरे (तापमान अंश सेल्सिअसमध्ये)
| शहर | तापमान |
|---|---|
| अकोला | ४५.१ |
| जळगाव | ४४.३ |
| अमरावती | ४४.० |
| वर्धा | ४३.८ |
| बीड | ४३.५ |
| छत्रपती संभाजीनगर | ४३.४ |
| बुलढाणा | ४३.२ |
| परभणी | ४३.२ |
| मालेगाव | ४३.२ |
नागरिकांसाठी सावधानतेचा इशारा
* दुपारी १२ ते ४ दरम्यान घराबाहेर पडणे टाळा
* भरपूर पाणी प्या
* डोक्यावर टोपी किंवा कापड वापरा
* लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घ्या
* उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या
शेतकऱ्यांना सल्ला
* दुपारच्या कडक उन्हात शेतीची कामे टाळावीत. सकाळी किंवा संध्याकाळी कामे करावीत.
* पिकांना हलके व वारंवार पाणी द्यावे, विशेषतः भाजीपाला, फळबाग आणि उन्हाळी पिकांकडे लक्ष द्यावे.
* ठिबक सिंचनाचा वापर करून पाण्याची बचत करावी.
* जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी आच्छादन (मल्चिंग) करावे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 12-05-2026














