Pune Dagdusheth Halwai Ganpati News : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Pune Dagdusheth Halwai Ganpat) संस्थानला राज्य सरकारकडून ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळून परिसराच्या सर्वांगीण विकासास आणि भाविकांच्या सुविधांमध्ये वाढ होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून या निर्णयाची घोषणा केली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दगडूशेठ गणपती संस्थानाला राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये विशेष स्थान मिळणार आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
॥ गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ ॥ मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती या संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे एकूणच या क्षेत्राचा एकूणच तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगिण विकास होणार आहे, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून दिली आहे.
देशभरातून तसेच परदेशातून येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता
‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाल्यानंतर संस्थान परिसरातील पायाभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक, स्वच्छता आणि पर्यटकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांच्या विकासाला गती मिळणार आहे. यामुळे देशभरातून तसेच परदेशातून येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अ दर्जा मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर प्रयत्नांना यश मिळाल्याने गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे पुण्यातील स्थानिक व्यापार, हॉटेल व्यवसाय, पर्यटन सेवा आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळणार आहे. गणेशोत्सवासह वर्षभर दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पुण्यात येत असतात. त्यामुळे धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून शहराच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
अत्यंत आनंदाची बाब, पुण्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवात भर पडणार : सुनेत्रा पवार
दरम्यान, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला राज्य सरकारकडून ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला राज्य सरकारकडून ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा प्रदान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचे मत सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले. या निर्णयामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून, तीर्थक्षेत्र म्हणून या परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत होईल. भाविकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होऊन पुण्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवात भर पडणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 19-05-2026














