श्रीकांत शिंदे यांना युवासेना प्रमुख आणि राष्ट्रीय सरचिटणीस करण्याची जाहीर मागणी
मुंबई: Ramdas Kadam Warning च्या धारदार विधानांनी मुंबईतील शिवसेनेच्या (शिंदे गट) वर्धापन दिन सोहळ्यात राजकीय ठिणगी टाकली आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिलेल्या ‘ऑपरेशन तुडवा’ या इशाऱ्याचा खरपूस समाचार घेताना, शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी संजय राऊत यांना थेट भाषणातून इशारा दिला. “आमच्या अंगावर कुणी आले, तर आम्ही त्यांना शिंगावर घेऊ. हिंमत असेल तर आमच्या एकाही खासदाराच्या केसाला धक्का लावून पाहा, काय होते ते दाखवून देऊ. आम्ही कायद्याचे राज्य मानणारे आहोत, याचा अर्थ आम्ही हतबल आहोत असा होत नाही. वेळ पडली तर तुमच्या घरात घुसून शिवसैनिकांची ताकद दाखवू,” अशा आक्रमक शब्दांत कदम यांनी आव्हान दिले.
उद्धव ठाकरेंच्या आत्मपरीक्षणाची गरज आणि संजय राऊतांवर टीका आपल्या भाषणात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या सद्यस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “उद्धव ठाकरेंवर आज ही वेळ का आली, याचा त्यांनी विचार करावा. पक्षातील ४० आमदार गेले, ज्येष्ठ नेते गेले, पदाधिकारी गेले आणि आज खासदारही सोडून गेले. उद्या उर्वरित आमदार आणि नगरसेवकही जातील. आपण कुठे चुकतोय, याचे आत्मपरीक्षण त्यांनी करायला हवे,” असा सल्ला त्यांनी दिला. तसेच, संजय राऊत जितके दिवस ठाकरे गटात थांबतील, तितके ते शिंदे सेनेसाठी फायद्याचेच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधल्याचा आरोप बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केल्याचा आरोप करत रामदास कदम यांनी ठाकरे गटाला धारेवर धरले. “शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी बेईमानी कुणी केली? भाजप-शिवसेना युती म्हणून निवडणुका लढवून जिंकल्यानंतर सत्तेसाठी सोनिया गांधींचे पाय धरायला कोण गेले? वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला. या उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्रं-दिवस संघटना वाढवण्यासाठी झटत असून, गेल्या तीन दिवसांपासून ते नीट झोपलेलेही नाहीत, असे सांगत महाराष्ट्राचा खरा ‘टायगर’ एकनाथ शिंदेच आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
‘ऑपरेशन टायगर’ आणि श्रीकांत शिंदेंना मोठ्या पदाची मागणी भाषणामध्ये रामदास कदम यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे विशेष कौतुक केले. “पक्ष वाचवण्याच्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये एकनाथ शिंदेंचे जेवढे योगदान आहे, त्यापेक्षा दोन पावले जास्त योगदान श्रीकांत शिंदे यांचे आहे,” असे ते म्हणाले. श्रीकांत शिंदे आज गावागावात जाऊन पक्षसंघटना आणि भगवा जिवंत ठेवण्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे शिवसेनेला अधिक गती आणि न्याय मिळण्यासाठी श्रीकांत शिंदे यांची ‘युवासेना प्रमुख’ आणि पक्षाचे ‘राष्ट्रीय सरचिटणीस’ म्हणून अधिकृत घोषणा करण्यात यावी, अशी जाहीर मागणी कदम यांनी मंचावरून केली.
बाळासाहेबांचा स्वर्गातून आशीर्वाद एकनाथ शिंदे यांनी धाडस दाखवून ४० आमदारांसह दोनतृतीयांश बहुमत सिद्ध केले आणि म्हणूनच खरी शिवसेना वाचली, अशी आठवण त्यांनी करून दिली. “आजचा हा ऐतिहासिक ६० वा वर्धापन दिन पाहून शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गातून दोन्ही हातांनी एकनाथ शिंदेंना आणि या संपूर्ण शिवसेनेला आशीर्वाद देत असतील,” अशी भावनिक जोड देत त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 20-06-2026














