रत्नागिरी : मुुुंबई- गोवा महामार्गासह मिर्या नागपूर महामार्गाची मोबदल्याची अपिले अद्यापही लालफितीत अडकली असून 2 अधिकार्यांच्या वादात शेतकर्यांचे मात्र अतोनात नुकसान होत आहे. जवळजवळ तीन ते साडेेतीन हजार अपिले अद्यापही प्रलंबित असून या अपिलांवर सुनावणी होणार तरी कधी? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
मुंबई-गोवा महामार्ग आणि त्यापाठोपाठ मिर्या-नागपूर महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात आले. या जागेचा दर गावांनुसार व रेडिरेकनरनुसार जाहीर करण्यात आला. 4 पट मोबदला या जागेसाठी शासनाने देवू केला. मात्र काही ठिकाणी भूसंपादन प्रक्रियेत कमी मोबदला आल्याने अनेक जमिन मालक, बागायतदार, शेतकरी यांनी या विरोधात सुरूवातीला प्रांतांकडे अपील केले होते. त्यानंतर जिल्हाधिकार्यांकडे अपीले करण्यात आली. जवळजवळ तीन ते साडे तीन हजार अपीले जादा मोबदला मिळावा यासाठी दाखल करण्यात आली.
भूसंपादनाची अपिले यापूर्वी अप्पर कलेक्टर यांच्या कोर्टात चालत होतीत त्यानंतर मात्र नवा वाद सुरू झाला. जिल्हाधिकारी आणि अप्पर कलेक्टर यांच्यापैकी कोणी अपीले चालवावीत यावरून एकमत होत नव्हते. मंत्रालय स्तरावर हा वाद गेला होता. जिल्हाधिकर्यांनी ही अपिले चालवावीत अशा सूचना मिळाल्या मात्र तीन ते चार वर्ष उलटून गेले तरी या अपीलांवर अद्यापही सुनावणी होऊ शकली नाही.
महामार्गासाठी शेतकर्यांच्या जमिनींचे भूसंपादन करण्यात आले. मात्र त्याचा मोबदला तुटपुंजा दिल्याने त्याविरोधात जिल्हाधिकार्यांकडे अपीले सादर करण्यात आली होती. मात्र ही अपीले अजूनही लालफितीत अडकून पडल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:53 09-01-2025














