साडवली : आजच्या युगात गुणपत्रकापेक्षा कौशल्य महत्वाचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने आपली कुवत ओळखून आपल्या भविष्यातील करिअरसाठी आवडीचे क्षेत्र निवडले पाहिजे, असे प्रतिपादन अॅड. विलास पाटणे यांनी केले.
देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. विलास पाटणे यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमातील प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी बदलते शैक्षणिक प्रवाह आणि वैयक्तीक कौशल्याचे महत्त्व, विविध कंपन्यांकडून कर्मचारी नियुक्तीमध्ये असणाऱ्या अपेक्षांबाबत सविस्तर विवेचन केले. प्रा. सानिका भालेकर यांनी शैक्षणिक तसेच सहशैक्षणिक कार्यक्रम-उपक्रमांच्या अहवालाचे वाचन केले. यानंतर पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन प्रा. सानिका भालेकर आणि प्रा. संदीप मुळ्ये यांनी केले. या प्रसंगी विद्याथ्यर्थ्यांना कला, क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धांमधील यशासाठी महाविद्यालयाच्यावतीने गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विशेष यशासाठी त्यांना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.

माजी विद्यार्थिनी सृष्टी वेल्हाळ हिला चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल तर विद्यार्थी विक्रम घाग व आयुष आगरे यांना त्यांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतील यशासाठी सन्मानित केले, या वेळी अॅड, पाटणे यांनी जगातील सर्वात आनंदी, सुखी व शांत असलेल्या फिनलैंड देशातील शैक्षणिक पद्धत व मूलभूत शैक्षणिक सुविधा याबाबत सविस्तर आढावा घेतला. एआय क्रांतीमुळे झालेले बदल, त्याचा कशाप्रकारे स्वीकार करून लाभ घेतला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी आपल्या आधुनिक एआय युग त्यातील जग आणि भारताला असणारी संधी याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात विविध बदल झाले तरीही व्यापार आणि शेती यामध्ये कोणतेही बदल होत नाहीत. प्रत्येकाने बदलण्याची आज खरी गरज आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 28/Jan/2025













